Mumbai 7/11 Blasts : ११ मिनिटांत सात स्फोटांनी हादरली होती मुंबई; हल्ल्याला २० वर्षे, मृतांना पश्चिम रेल्वेकडून श्रद्धांजली

मुंबईला हादरवून सोडणाऱ्या ११ जुलै २००६ च्या लोकल बॉम्बस्फोटांना २० वर्षे पूर्ण झाली. अवघ्या ११ मिनिटांत झालेल्या सात स्फोटांत १८० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. पश्चिम रेल्वेने माहीम स्थानकावर मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.
Mumbai 7/11 Blasts : ११ मिनिटांत सात स्फोटांनी हादरली होती मुंबई; हल्ल्याला २० वर्षे, मृतांना पश्चिम रेल्वेकडून श्रद्धांजली
Published on

मुंबईच्या उपनगरी रेल्वे सेवेला लक्ष्य करत ११ जुलै २००६ रोजी घडवण्यात आलेल्या भीषण ७/११ बॉम्बस्फोटाला आज २० वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या १८० हून अधिक प्रवाशांना पश्चिम रेल्वेकडून शनिवारी (दि. ११) माहिम रेल्वे स्थानकात पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्ल्यात सुमारे ८०० जण जखमी झाले होते.

माहिम स्थानकात श्रद्धांजली

पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी माहिम स्थानकातील स्मारकाजवळ एकत्र आले आणि मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पश्चिम रेल्वेचे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी (PCPO) सहर्ष बाजपेयी यांनी या घटनेची आठवण काढत, अशा प्रकारची घटना पुन्हा कधीही घडू नये, अशी प्रार्थना केली.

त्यांनी सांगितले, "दरवर्षी या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. आज या घटनेला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. भविष्यात अशी घटना पुन्हा कधीच घडू नये, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे."

११ मिनिटांत सात स्फोटांनी हादरली होती मुंबई

११ जुलै २००६ रोजी सायंकाळी ६.२४ वाजल्यापासून अवघ्या ११ मिनिटांच्या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या उपनगरी लोकलमधील प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. हे स्फोट माटुंगा रोड, माहिम जंक्शन, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, भाईंदर आणि बोरीवली स्थानकांजवळ झाले.

तपासानुसार, प्रेशर कुकरमध्ये लपवून ठेवलेल्या स्फोटकांचा वापर या हल्ल्यासाठी करण्यात आला होता. या भीषण हल्ल्यात १८० हून अधिक जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे ८०० प्रवासी जखमी झाले.

माहिमसह सात स्थानकांवर स्मारक

या हल्ल्यानंतर पश्चिम रेल्वेने माहिम स्थानकात स्मारक उभारले असून, ज्या सात स्थानकांवर स्फोट झाले तेथे स्मृतिफलक बसवण्यात आले आहेत. दरवर्षी ११ जुलै रोजी या स्मारकांवर श्रद्धांजली वाहून मृतांचे स्मरण केले जाते.

तपासात अनेक आरोपींना अटक

या साखळी बॉम्बस्फोटानंतर मुंबई पोलिसांसह विविध तपास यंत्रणांनी व्यापक तपास सुरू केला होता. सुरुवातीला लष्कर-ए-तोयबा आणि बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) या संघटनांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. पुढील तपासात इंडियन मुजाहिदीनशी संबंधित काही आरोपींना अटक करण्यात आली आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in