मुंबई : संख्याबळाअभावी वडाळ्यातील गृहनिर्माण संस्थेचा मंजूर होणारा प्रस्ताव नामंजूर करण्याची वेळ भाजपवर आली. या प्रकारानंतर भाजपच्या नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आली होती. ३५ ते ४० नगरसेवकांनी नोटीशीला उत्तर देताना खुलासा केला तो न पटणारा असल्याने भाजपकडून नगरसेवकांना उपदेशाचा डोस देण्यात आला आहे. भविष्यात अशी चूक होऊ नये, याची खबरदारी घ्यावी, अशी समज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवकांना दिल्याचे भाजपच्या गोटातून समजते.
वडाळ्यातील गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पाचा प्रस्ताव महापालिकेच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तातडीचे कामकाज म्हणून महापौर रितू तावडे यांनी प्रस्ताव सभागृहात पटलावर ठेवला. मात्र सत्ताधाऱ्यांकडे बहुमत आहे की नाही, याची यावेळी खात्री करण्यात आली नाही. याचाच फायदा घेत शिवसेना ठाकरे गटाने तातडीच्या कामकाजासाठी मतदान घेण्याची मागणी केली. अखेर हा प्रस्ताव मतदानासाठी टाकला असता, भाजप-शिवसेनेकडे बहुमत नसल्यामुळे तातडीचे कामकाज म्हणून प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळे सत्ता असूनही भाजपवर नामुष्की ओढावली. याची गंभीर दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे समजते.
सभागृहात अथवा समितीमध्ये एखादा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल अथवा एखादा प्रस्ताव मंजूर करायचा असेल तर कोणती काळजी घ्यावी, यासाठी मुंबईतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी महापौर रितू तावडे यांच्यासह वरिष्ठ नगरसेवकांची मंगळवारी भाजपच्या दादर येथील पक्ष कार्यालयात शाळा भरवली होती. यावेळी पालकमंत्री ॲॅड. आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष अमित साटम, भाजपा नेते प्रवीण दरेकर व अन्य जेष्ठ नेते तसेच सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे व वरिष्ठ नगरसेवक तसेच समित्यांचे अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी सभागृहात उडणाऱ्या गोंधळाबद्दल नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेत सत्ता असताना पक्षावर नामुष्की ओढावून का घ्यायची, अशी विचारणा यावेळी नेत्यांनी नगरसेवकांकडे केल्याचे समजते. अभ्यास करून एखादा निर्णय घेणे, योग्य ठरेल. घाई गडबडीत प्रशासकीय माहिती न घेता कोणत्याही निर्णय घेऊ नये, असा सल्लाही नेत्यांनी यावेळी दिला.