

मुंबई : सर्वपक्षीय नगरसेवकांना शिस्त लागावी, यासाठी आता मुंबई महापालिका मुख्यालयात येणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. भाजपचे कुलाबा येथील नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी महापौर रितू तावडे यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात यावी, असे पत्र लिहिले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या पक्षकार्यालयात भाजप नगरसेवकांसाठी बायोमेट्रिक हजेरी मशीन बसवण्यात आली आहे.
बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक या निर्णयामुळे बीएमसीच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. आपण बीएमसीमधील आपल्या कार्यालयात बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली यशस्वीपणे लागू केली आहे. यामुळे उपस्थितीची अचूक नोंद ठेवणे शक्य झाले असून नगरसेवकांमध्ये शिस्तही निर्माण झाली आहे. याच धर्तीवर सर्वसाधारण सभेसाठीही अशीच प्रणाली लागू करणे योग्य ठरेल, असे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
अशा उपाययोजनांमुळे नगरसेवकांमध्ये वक्तशीरपणा आणि सक्रिय सहभागाला प्रोत्साहन मिळेल, तसेच पारदर्शक प्रशासनामुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल. ज्या काळात नागरिक आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून अधिक उत्तरदायित्वाची अपेक्षा करत आहेत, त्या काळात हे पाऊल सुशासनासाठी आपली बांधिलकी दर्शवेल, असेही त्यांनी नमूद केले.