भारतीय क्रिकेट नियामक मंडळाप्रमाणेच (बीसीसीआय) आता मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटपूटंना करारबद्ध करणार आहे. या संकल्पनेला एमसीएने तत्वतः मान्यता दिली आहे.
एका एमसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या वरिष्ठ सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या कराराचे स्वरूप बीसीसीआयच्या क्रेंद्रीय करारासारखेच असणार आहे. याबाबतची संरचना लवकरच एमसीएसची क्रिकेट सुधार समिती तयार करिल. एमसीएच्या क्रिकेट सुधार समितीत सध्या नीलेश कुलकर्णी, जतिन परांजपे आणि विनोद कांबळी यांचा समावेश आहे. बीसीसीआय आपल्या पुरूष आणि महिला खेळाडूंसाठी केंद्रीय करार पद्धतीचा अवलंब करते. या कराराअंतर्गत खेळाडूंना त्यांच्या ग्रेडनुसार वार्षिक रक्कम मिळते. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, एमसीएची क्रिकेट सुधारणा समिती खेळाडूंचे ग्रेड कशा प्रकारे तयार करता येईल हे पाहील. याचबरोबर प्रत्येक ग्रेडला किती रक्कम द्यायची याचाही विचार केला जाईल. याचबरोबर कोणत्या खेळाडूंना करारबद्ध करायचे हे देखील याच समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात येणार आहे. दरम्यान, एमसीएने यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविणाऱ्या मुंबईच्या संघाला एक कोटी रूपयांचे बक्षीस देखील जाहीर केले. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने मुंबईचा पराभव केला होता. रणजी संघाचे नेतृत्व पृथ्वी शॉने केले होते. याचबरोबर एमसीएसने सी के नायडू ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या २५ वर्षाखालील संघाला देखील रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर कूच बिहार ट्रॉफीत उपविजेतपद पटकाविणाऱ्या मुंबईच्या संघाला देखील बक्षीस मिळणार आहे.