GMLR प्रकल्पातील बाधितांसाठी आनंदाची बातमी! महिनाअखेरीस कांजूरमार्ग येथे मिळणार नवी घरे

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता (GMLR) प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांसाठी दिलासादायक बातमी आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडून कांजूरमार्ग येथे उभारण्यात येत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील दोन इमारतींचे काम अंतिम टप्प्यात असून, या महिनाअखेरीस सुमारे २५२ प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
GMLR प्रकल्पातील बाधितांसाठी आनंदाची बातमी! महिनाअखेरीस कांजूरमार्ग येथे मिळणार नवी घरे
GMLR प्रकल्पातील बाधितांसाठी आनंदाची बातमी! महिनाअखेरीस कांजूरमार्ग येथे मिळणार नवी घरे
Published on

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडून कांजूर (पश्चिम) येथे प्रकल्पग्रस्त कुटुंबांसाठी ९०६ घरांचे गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येत असून, त्यापैकी काही इमारतींचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मार्च २०२६ अखेरपर्यंत २५२ कुटुंबांना नव्या घरांमध्ये स्थलांतरित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

प्रकल्पग्रस्तांना मिळणार कायमस्वरूपी घर

GMLR या महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पामुळे अनेक कुटुंबांना आपली घरे सोडावी लागणार आहेत. या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी कांजूर (पश्चिम) येथे ‘बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प’ अंतर्गत सात निवासी इमारती उभारण्यात येत आहेत. सुमारे १० हजार ५० चौरस मीटर क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात एकूण ९०६ सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

घरासोबत मूलभूत सुविधा

या सदनिकांमध्ये पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, वीजजोडणी, लिफ्ट व्यवस्था, पायऱ्या आणि अग्निसुरक्षा यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त कुटुंबांना सुरक्षित आणि सुसज्ज घरे मिळणार आहेत.

कामाची प्रत्यक्ष पाहणी

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या प्रकल्पस्थळी भेट देऊन बांधकामाची प्रगती आणि गुणवत्तेची पाहणी केली. त्यांनी सदनिकांच्या अंतर्गत रचना तसेच विविध नागरी सुविधांची बारकाईने तपासणी केली आणि प्रकल्पाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.

उर्वरित घरांचे कामही वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश

एकूण सात इमारतींपैकी दोन इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. मार्च २०२६ अखेरपर्यंत २५२ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उर्वरित इमारतींचे कामही ठरलेल्या वेळेत पूर्ण करून लवकरात लवकर सर्व प्रकल्पग्रस्त कुटुंबांना घरे उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या पाहणीदरम्यान नगर अभियंता रामचंद्र कदम, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in