

मुंबई : मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुट्टीच्या कॅलेंडरमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने यंदा गोपाळकाला अर्थात दहीहंडीची स्थानिक सुट्टी रद्द करून त्याऐवजी रक्षाबंधनसाठी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील संबंधित सरकारी आणि निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी असेल.
सामान्य प्रशासन विभागाने १० ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत शुद्धीपत्रक जारी केलं आहे. यापूर्वीच्या परिपत्रकानुसार शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी गोपाळकाला (दहीहंडी) निमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, नव्या शुद्धीपत्रकानुसार ही तारीख बदलून रक्षाबंधनसाठी २८ ऑगस्टची सुट्टी निश्चित करण्यात आली आहे.
सलग ३ दिवस सुट्टीचा फायदा
या बदलामुळे मुंबईतील पात्र कर्मचाऱ्यांना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सलग तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. शुक्रवार, २८ ऑगस्टला रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी, त्यानंतर २९ ऑगस्ट शनिवार आणि ३० ऑगस्ट रविवार असल्याने सलग तीन दिवसांचा ब्रेक मिळेल.
त्यामुळे रक्षाबंधनासाठी बाहेरगावी किंवा नातेवाईकांकडे जाण्याचा विचार करणाऱ्यांना प्रवासाचं नियोजन करण्यासाठीही हा निर्णय फायदेशीर ठरू शकतो.
कोणाला लागू होणार ही सुट्टी?
शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार ही स्थानिक सुट्टी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांसाठी लागू असणार आहे. त्यामुळे खासगी कंपन्या, बँका, शाळा किंवा इतर संस्थांना ही सुट्टी आपोआप लागू होईलच असं नाही. संबंधित संस्थांनी स्वतंत्रपणे जारी केलेली सूचना तपासणं आवश्यक आहे.
५ सप्टेंबरला काय होणार?
दरम्यान, ५ सप्टेंबर २०२६ रोजी दहीहंडीची स्थानिक सुट्टी असणार नाही. मात्र, हा दिवस शनिवार असल्याने ज्या कार्यालयांमध्ये शनिवारी नियमित सुट्टी असते, त्या कर्मचाऱ्यांना नेहमीप्रमाणे शनिवारची सुट्टी लागू राहील.