

मुंबई : स्वस्त व योग्य उपचार पद्धती यामुळे देशभरातील रुग्ण मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतात. मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात १४ हजार ६५३ रुग्णशय्या उपलब्ध असून नवीन रुग्णालये सेवेत आल्यानंतर आणखी ४ हजार ५५६ रुग्णशय्यांची पडणार आहे. पालिकेच्या रुग्णालयात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर आरोग्य संस्थांचा परिसर स्वच्छ व अतिक्रमण मुक्त करा, सहाय्यक आयुक्तांनी आरोग्य संस्थांची नियमित पाहणी करावी, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.
मुंबई महापालिकेच्या विविध विभागातील कामाचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. 'मुंबई महापालिकेची सुमारे ५०० हून अधिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे, 'हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना', पॉलिक्लिनिक, भर प्रसूतिगृहे, विशेषोपचार रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत आहेत. दरवर्षी सुमारे दोन कोटींहून अधिक नागरिक या आरोग्य सुविधांचा लाभ घेतात. महापालिकेच्या आरोग्य सेवांचा विस्तार, आधुनिकता आणि वैद्यकीय सेवांची गुणवत्ता सातत्याने अधिक सक्षम व उंचावत आहे. दवाखाने व रुग्णालयांच्या इमारती आकर्षक, एकसमान रंगसंगतीने उठावदार दिसाव्यात, परिसरात स्वच्छता, शिस्त आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण व्हावी, तसेच नियमित देखभाल व दुरुस्तीमुळे या आरोग्य संस्थांचे दर्जेदार स्वरूप कायम राखले जावे, असे निर्देश आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.
वाहतुकीसाठी रस्त्यांचा समतोल राखा!
सध्या सुरू असलेली सर्व रस्त्यांची कामे ३१ मेपर्यंत पूर्णत्वास नेण्यात यावीत. रस्त्यांची कामे करताना केवळ तुकड्यांमध्ये नव्हे, तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावा. ज्या ठिकाणी या हंगामात काँक्रीट रस्त्यांची कामे होणे शक्य नाही, त्या ठिकाणी काँक्रीट रस्त्यांप्रमाणेच दर्जेदार मास्टिक रस्ते तयार करण्यात यावेत. हे रस्ते वाहतुकीस सुरक्षित, सुयोग्य आणि एकसमान पातळीचे असावेत; कुठेही उंचसखलपणा राहू नये. आवश्यकतेनुसार मिलिंगची कामे करून रस्त्यांची पातळी संतुलित ठेवावी. तसेच, वाहतूक सुरक्षितता अधिक प्रभावी करण्यासाठी थर्मोप्लास्टिक मार्किंग, रंबलर स्ट्रिप्स आदी आधुनिक पर्यायांचाही आवश्यकतेनुसार वापर करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
मॅनहोल्स उघडी राहणार नाहीत, याची दक्षता घ्या!
कोणत्याही परिस्थितीत एकही मॅनहोल्स उघडी राहणार नाहीत, याची अत्यंत काटेकोर दक्षता घेण्यात यावी. पावसाळ्यापूर्वी सर्व प्रवेशिकांवर संरक्षक जाळ्या बसविणे अनिवार्य असून, कोणतीही दुर्घटना अथवा अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे निर्देश भिडे यांनी दिले.