मुंबईतील जुहू चौपाटीवरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी पैसे घेत असल्याचे दिसत असून, त्याच्या या अनोख्या उपक्रमाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेगवान शहरी जीवनात वाढत चाललेला एकटेपणा, भावनिक आधाराची गरज आणि मानसिक स्वास्थ्याचा प्रश्न यामुळे या व्हिडिओची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.
साध्या फलकासह बसलेला हा व्यक्ती येणाऱ्या-जाणाऱ्यांना आपली समस्या सांगण्यासाठी आमंत्रित करताना दिसतो. साध्या संवादाला त्याने एका वेगळ्या सार्वजनिक सेवेसारखे रूप दिले असून, या कल्पनेने काहींना आश्चर्याचा धक्का दिला आहे, तर काहींना ही सेवा विचार करायला लावणारी वाटत आहे.
भावनांनाही दर ठरलेले
व्हिडिओमध्ये ही व्यक्ती आपले दर अगदी स्पष्टपणे सांगताना दिसते. छोट्या समस्यांसाठी तो २५० रुपये, मोठ्या चिंतांसाठी ५०० रुपये आणि सोबत बसून रडायचे असल्यास १,००० रुपये घेतो, असे तो सांगतो. शांत समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मांडलेली ही कल्पना अनेकांना वेगळी आणि उत्सुकता वाढवणारी वाटली.
त्याच्या म्हणण्यानुसार, अनेक लोक प्रत्यक्ष त्याच्याकडे येतात. तो त्यांच्याशी संवाद साधतो, त्यांचे विचार मोकळे होण्यास मदत करतो आणि मन हलके करण्याचा प्रयत्न करतो.
संवादापलीकडची मदत?
अंधेरीतील पृथ्वी राजपोळा असे या व्यक्तीचे नाव सांगितले जात आहे. तो केवळ गप्पा मारण्यापुरतीच नव्हे, तर लोकांना त्यांच्या समस्यांकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्यास आणि अडचणीतून मार्ग शोधण्यास मदत करत असल्याचा दावा करतो.
व्हायरल व्हिडिओ पाहा
शहरी एकटेपणाचं वास्तव पुन्हा चर्चेत
दरम्यान, या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. काहींना ही कल्पना वेगळी आणि उपयुक्त वाटते, तर काहीजण याकडे संशयाने पाहत आहेत. मात्र, या घटनेतून मोठ्या शहरांतील एकटेपणा आणि मानसिक ताण यांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.