

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना घडतात. गेल्या ३४ वर्षात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये ३४० लोकांचा मृत्यू झाला तर ३०० हून अधिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील दरडी कोसळून होणारी जीवित आणि वित्त हानी नवीन नसून मागील १५ वर्षांपासून दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही.
मुंबईतील ३६ पैकी २५ मतदारसंघात २५७ ठिकाण डोंगराळ भागात धोकादायक म्हणून वर्गीकृत आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले की, या भागातील २२,४८३ झोपड्यांपैकी ९,६५७ झोपड्यांना प्राधान्याने स्थानांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य शासनाला केली. यात उर्वरित झोपड्यांना टेकड्यांच्या आजूबाजूला तटबंदी बनवून संरक्षित करण्याचे प्रस्तावित केले होते. पावसाळयात भूस्खलनामुळे ३२७ ठिकाणाबाबत गलगली यांनी सरकारला सतर्क केले होते.
वर्ष १९९२ ते २०२६ या दरम्यान दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ३४० लोकांनी जीव गमावला असून ३०९ हून अधिक जखमी झाले आहेत. २०१० मध्ये सर्वसमावेशक सर्वेक्षण करणार्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने शिफारस केली होती आणि त्यावर वेळीच कार्यवाही झाली असती तर डोंगराळ भागात राहणाऱ्यांच्या मृत्यूला रोखता आले असते. मंडळाचा अहवाल व गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर १ सप्टेंबर २०११ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. १५ वर्षे उलटून गेली, परंतु नगरविकास विभाग अद्याप त्याची अंमलबजावणी करत आहे, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर अॅक्शन टेकिंग प्लॅन तयार केलाच नाही, असे ते म्हणाले.