

मुंबई : मुंबईत पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका कायम असून शहर आणि उपनगरातील तब्बल २४९ ठिकाणी दरडप्रवण भागांच्या आसपास मोठ्या प्रमाणात घरांची वस्ती आहे. यापैकी ७४ ठिकाणे धोकादायक, तर ४६ ठिकाणे अतिधोकादायक आहेत. मुंबईत पावसाळ्यात डोंगर उतारावरील हजारो रहिवाशांच्या जीवाला धोक्यात असून दरडींची टांगती तलवार कायम आहे.
दरम्यान, मुंबईतील दरडप्रवण ठिकाणांमध्ये एस वॉर्डमध्ये सर्वाधिक ११६ ठिकाणे आहेत. या वॉर्डमध्ये भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, नाहूर आणि पवईचा समावेश होतो. त्यापाठोपाठ एन वॉर्डमधील घाटकोपरमध्ये ३२, एल वॉर्डमधील कुर्ला, साकीनाका, असल्फा आणि चांदिवली परिसरात १७ ठिकाणे आहेत.
डी वॉर्डमधील मलबार हिल, वाळकेश्वर आणि गिरगाव परिसरात १५, पी उत्तर वॉर्डमधील मालाडमध्ये ११, तर जी दक्षिण वॉर्डमधील वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी आणि लोअर परळ परिसरात १० दरडप्रवण ठिकाणे आहेत. एफ दक्षिण वॉर्डमधील परळ, लालबाग, हिंदमाता, टी वॉर्डमधील मुलुंड तसेच एफ उत्तर वॉर्डमधील माटुंगा, सायन आणि वडाळा परिसरातही दरड कोसळण्याचा धोका असलेली ठिकाणे आहेत.
दरवर्षी भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला या भागात पावसाळ्यापूर्वी दरडप्रवण भागांची पालिका प्रशासन व एनडीआरएफकडून पाहणी केली जाते. दरडीचा धोका कसा ओळखावा, बचावकार्य आणि प्रथमोपचार कसा करावा, याबाबत स्थानिकांना मार्गदर्शन केले जाते.
कोट्यवधींचा खर्च, तरी दरडींचा धोका कायम
डोंगर उतारावरील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंती उभारणे, डोंगर उतार सुरक्षित करणे यांसारखी कामे राज्य सरकारच्या मदतीने करण्यात येत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जातो. मात्र दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या विविध भागांत दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने या उपाययोजनांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.