

मुंबई : १६ वर्षांपूर्वी लोकलमधून पडून अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या आईला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने न्याय दिला. तरुणाचा अपघाती मृत्यू ‘दुर्दैवी घटना’ असल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी नोंदवले. त्याच आधारे न्यायालयाने विक्रोळीतील तरुणाच्या आईला ४ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली. रेल्वे प्रशासनाने भरपाईची रक्कम दोन महिन्यांत याचिकाकर्त्या आईच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
२४ सप्टेंबर २०१० रोजी श्रीनिवास कोमुरावेली हा तरुण डॉकयार्ड रोड ते विक्रोळी असा प्रवास करीत होता. शिवडी रेल्वे स्थानकाजवळ तरुणाचा अपघाताचा मृत्यू झाला. रेल्वे दावा न्यायाधिकरणाने तरुण रुळ ओलांडत होता, त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त करत नुकसानभरपाईचा दावा फेटाळला होता.
न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरोधात मृत तरुणाच्या पालकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. याप्रकरणी न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने सुनावणी घेतली आणि मृत तरुणाच्या आईला दिलासा दिला. मृत तरुणाकडे विक्रोळी ते डॉकयार्ड रोड प्रवासाचे वैध तिकीट सापडले होते. त्यामुळे तो वैध प्रवासी होता हे सिद्ध होते.