मुंबईची लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या उपनगरी लोकलमधील धोकादायक प्रवासाचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बंद दरवाज्यांची लोकल सुरू असतानाही काही प्रवासी बाहेरून लटकत प्रवास करताना या व्हिडीओत दिसत आहेत. त्यामुळे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, यालाच 'मुंबई स्पिरिट' म्हणायचं का, असा सवालही उपस्थित होत आहे.
नेमकं काय दिसतंय व्हिडीओत?
इन्स्टाग्रामवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओत काही पुरुष प्रवासी लोकलच्या बाहेरील कडेला जीव धोक्यात घालून लटकताना दिसतात. विशेष म्हणजे, डब्याचे दरवाजे बंद असतानाही हा प्रकार घडताना दिसतो. ही घटना मध्य रेल्वेच्या एका स्थानकावरील असल्याचे सांगितले जात आहे.
लोकल सुटू लागल्यानंतर हे प्रवासी बाहेरूनच लटकून राहतात. पुढे डब्याच्या आत असलेले काही प्रवासी दरवाजे उघडून बाहेर लटकणाऱ्यांना आत ओढून घेतानाही दिसतात. गर्दीच्या वेळेत मुंबई लोकलमधील प्रचंड ताण नवा नाही. मात्र, वेळेत पोहोचण्यासाठी प्रवासी कोणत्या टोकाला जात आहेत, हे या दृश्यांतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
'मुंबई स्पिरिट'वर नवी चर्चा
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काहींनी अशा प्रकारांना 'मुंबई स्पिरिट' म्हणून गौरवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईकरांची जिद्द, चिकाटी आणि परिस्थितीशी लढण्याची वृत्ती दाखवण्यासाठी हा शब्द वापरला जातो. मात्र, रोजच्या प्रवासासाठी जीव धोक्यात घालणं ही जिद्द नसून व्यवस्थेतील त्रुटींचं चित्र आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
सुरक्षा उपायांवरही प्रश्न
या व्हिडीओचं महत्त्व आणखी वाढण्याचं कारण म्हणजे मध्य रेल्वेकडून शहरातील पहिल्या नॉन-एसी बंद दरवाज्यांच्या लोकल सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अलीकडील मुंब्रा दुर्घटनेनंतर प्रवासी सुरक्षा, गर्दी आणि उघड्या दरवाज्यांमधून होणारा धोकादायक प्रवास या मुद्द्यांकडे पुन्हा लक्ष वेधले गेले होते. त्यानंतरच बंद दरवाज्यांच्या यंत्रणेवर भर देण्यात येत आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहा
मात्र, हा व्हिडीओ पाहता एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. गर्दी किंवा वेळेची घाई यामुळे प्रवासीच सुरक्षा नियमांना बगल देत असतील, तर अशा स्वयंचलित यंत्रणांचा अपेक्षित फायदा कितपत होणार?
फक्त सुविधा पुरेशा ठरणार का?
मुंबईतील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता, केवळ पायाभूत सुविधा वाढवून हा प्रश्न सुटणार नाही, हे या घटनेतून स्पष्ट होते. अधिक क्षमतेच्या सेवा, नियमांची कडक अंमलबजावणी आणि प्रवाशांच्या वर्तनात बदल या तिन्ही गोष्टींची एकत्र गरज असल्याचे या व्हिडीओने पुन्हा अधोरेखित केले आहे.
वेग, गर्दी आणि वेळेची शर्यत यांच्यामध्ये सुरक्षितता मागे पडू नये, यासाठी आता अधिक ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.