
मुंबई : एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मान्सूनने मुंबई, ठाण्यात बुधवारी दुपारच्या वेळेस दमदार हजेरी लावली. काही मिनिटांतच कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे अंधेरीतील मिलन सबवे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र पाऊस थांबताच, हा सबवे पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
कल्याण, डोबिंवली, ठाणे, दादर तसेच मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, अंधेरी, गोरेगाव या भागात पावसाने दुपारी झोडपले. यामुळे सखल भागात पाणी साचले होते. जोरदार पावसाचा फटका रेल्वेलाही बसला.
मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती. तर पश्चिम रेल्वेही वाहतूकही मंदावली होती. मुंबई पुण्यासह कोकणातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. त्यामध्ये, काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून घरांचेही नुकसान झाले आहे. अंधेरी पूर्वेत ओल्ड नागरदास परिसरात जोरदार पावसामध्ये रिक्षावर झाड कोसळल्याची घटना घडली.
पुण्यात झाड कोसळून एकाचा मृत्यू
पुण्यात झाड उन्मळून पडल्याने आतापर्यंत दुसरा बळी गेला आहे. पुण्यातील निलायम टॉकीजसमोर रस्त्यावर झाड पडल्यामुळे रिक्षात बसलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला. ७६ वर्षीय शुभदा सप्रे यांच्या अंगावरच झाड कोसळल्याने त्यांना प्राण गमवावे लागले.