Mumbai Tiranga March : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही मोर्चा होणारच! 'हा तरुणाईच्या विजयाचा जल्लोष'; ठाकरे बंधूंची घोषणा

"हा तरुणाईचा मोठा विजय आहे. या जेनझींनी सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत. त्यामुळे या विजयाचा जल्लोष होणे गरजेचे आहे..."
Mumbai Tiranga March : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही मोर्चा होणारच! 'हा तरुणाईच्या विजयाचा जल्लोष'; ठाकरे बंधूंची घोषणा
Mumbai Tiranga March : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही मोर्चा होणारच! 'हा तरुणाईच्या विजयाचा जल्लोष'; ठाकरे बंधूंची घोषणा
Published on

मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने देशभर आंदोलन छेडले होते. अखेर प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईत उद्या २६ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला तिरंगा मार्च होणार की रद्द होणार, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषदेत हा मार्च पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे स्पष्ट केले. आता हा मोर्चा आंदोलनासाठी नव्हे, तर देशभरातील तरुणांच्या विजयाचा गौरव करण्यासाठी काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढण्याचे काम तरुणांनी केले'

उद्धव ठाकरे म्हणाले की, हा लढा केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नव्हता. देशभरातील तरुणांनी भीतीचे वातावरण झुगारून लोकशाहीची ताकद दाखवून दिली आहे. "एका झुरळाने हुकूमशाहला झुकवले," असे म्हणत त्यांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांचे कौतुक केले.

त्यांनी अभिजीत दिपके यांच्या आई-वडिलांचेही अभिनंदन केले. तसेच, सीजेपीच्या अजून दोन मागण्या प्रलंबित असल्याने जंतरमंतरवरील आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

'हा तरुणाईचा मोठा विजय'

राज ठाकरे म्हणाले की, रविवारी शिवाजी पार्कवर होणारा कार्यक्रम आता आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नव्हे, तर देशभरातील तरुणांचे अभिनंदन करण्यासाठी असेल.

"हा तरुणाईचा मोठा विजय आहे. एका वाक्याचं वर्णन करायचे झाले तर, या जेनझींनी सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत. त्यामुळे या विजयाचा जल्लोष होणे गरजेचे आहे," असे ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, यापुढे अभिजीत दिपके जे निर्णय घेतील, त्याला त्यांचा पूर्ण पाठिंबा असेल. त्यांनी या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. तसेच, देशातील युवकही त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रविवारी शिवाजी पार्कमध्ये जमणार तरुणाई

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शिवाजी पार्क ते प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. आता राजीनामा झाल्यानंतरही हा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला नसून, तो तरुणांच्या विजय सोहळ्याच्या स्वरूपात पार पडणार असल्याचे ठाकरे बंधूंनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in