

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विभागांच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन कार्य आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांना पुन्हा एकदा मान्यता मिळाली आहे. विद्यापीठ प्रशासनाने या दोन्ही विभागांचा स्वायत्त दर्जा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे विभागांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेवर पुनश्च शिक्कामोर्तब झाले आहे.
रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र हे मुंबई विद्यापीठातील अत्यंत प्रतिष्ठित आणि संशोधनाभिमुख विभाग मानले जातात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने अभ्यासक्रमामध्ये सातत्याने सुधारणा, उद्योग व संशोधन संस्थांशी समन्वय, आधुनिक प्रयोगशाळा सुविधा तसेच विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य या विभागांकडून प्रभावीपणे केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर, विद्यापीठाने या विभागांचा स्वायत्त दर्जा पुढेही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळ, विद्या परिषद आणि तज्ज्ञ समिती यांनी केलेल्या पाहणीनंतर स्वायत्त दर्जा कायम ठेवण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने स्वायत्त विभागांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आगामी काळात संशोधन, नवोन्मेष आणि कौशल्याधारित शिक्षणाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असून या विभागांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक व्यापक शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू