मुंबई : विद्याविहार पूर्व व पश्चिमेला जोडण्यासाठी रेल्वे स्थानकात उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. या उड्डाणपुलाच्या पोहच रस्त्यांच्या कामात अडथळा ठरणाऱ्या झाडांची कापणी, पुनर्रोपण व नवीन झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र वन विकास महामंडळाची नियुक्ती करण्यात आली असून, महामंडळास मोबदला म्हणून १ कोटी ९९ लाख ९ हजार ८३९ रुपये पालिका मोजणार आहे.
विद्याविहार रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाच्या पोहच रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदार मे. ए. बी. इन्फ्राविल्ड लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कामास सुरुवात करण्याचे आदेश पूल विभागाने दिले असून पूल, पोहच रस्ते या सगळ्या कामाची कंत्राट किंमत ७६,१८,८०,९८७ असून कंत्राट कालावधी पावसाळा वगळून १८ महिने आहे. रस्ता रेषेमध्ये झालेल्या बदलामुळे अतिरिक्त २४ वृक्ष कापणे व पुनर्लागवड करण्यासंदर्भात प्रस्ताव उप-उद्यान अधीक्षक परि-६ यांना सादर केलेला आहे.
१८९ झाडांचा अडथळा
या उड्डाणपुलाच्या पोहच रस्त्यांचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणांतर्गत एकूण १८९ वृक्ष बाधित होत असल्यामुळे सदर प्रस्ताव उद्यान अधीक्षक विभागाकडे पाठवला असता त्यांच्याकडून वृक्ष तोडणी/ पुनर्रोपणासाठी परवानगी प्राप्त झाली. उद्यान विभागाच्या परवानगीनुसार ६५ वृक्ष कापणी करणे, ७३ वृक्ष पुनर्रोपण करणे व ५१ वृक्ष आहे त्याच जागी ठेवण्याचे नमूद करण्यात आले. तसेच ६५ वृक्ष कापणी व ७३ वृक्ष पुनर्रोपण करण्याच्या बदल्यात एकूण १९९० नवीन वृक्ष लावण्याचे प्रस्तावात नमूद केलेले आहे.