मुंबई महानगर प्रदेशात (MMR) नव्या वाहतूक पर्यायाची चर्चा सध्या जोरात रंगली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टनुसार, मुंबईत लवकरच ‘वॉटर मेट्रो’ सुरू होऊ शकते. या प्रकल्पाअंतर्गत ३४० किलोमीटर लांबीचे जाळे आणि ३६ मार्ग प्रस्तावित असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये कल्याण ते गेटवे ऑफ इंडिया हा महत्त्वाचा मार्ग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
व्हायरल पोस्ट मध्ये नेमकं काय?
व्हायरल पोस्टनुसार, या वॉटर मेट्रोसाठी सुरुवातीला युरोपमधून इलेक्ट्रिक फेरी बोटी आणल्या जाणार आहेत. तसेच या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, या मार्गांबाबत आणि वेळापत्रकाबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
मुख्यमंत्र्यांचे निर्देश
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना काम गतीने करण्याचे निर्देश दिले. प्रकल्प तीन टप्प्यांत राबवला जाणार असून जहाजबांधणीसाठी योग्य जागा निश्चित करण्यावरही भर देण्यात आला आहे. तसेच बोटींचे उत्पादन महाराष्ट्रातच करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
पाहा व्हायरल पोस्ट
DPR तयार करण्याची प्रक्रिया सुरू
मागील वर्षी एप्रिलमध्ये महाराष्ट्र सरकारने कोची वॉटर मेट्रोकडून या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम दिले होते. बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी हा अहवाल निश्चित कालावधीत सादर होईल, असे सांगितले होते.
अंमलबजावणीसाठी स्वतंत्र संस्था
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विशेष उद्देश संस्था (SPV) स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात ५०:५० भागीदारीत हा प्रकल्प राबवला जाऊ शकतो.
पर्यावरणपूरक आणि पर्यायी वाहतूक
हा प्रकल्प प्रत्यक्षात आला, तर मुंबईतील गर्दीने गुदमरलेल्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला मोठा दिलासा मिळू शकतो. शहराच्या किनारपट्टी आणि जलमार्गांचा वापर करून पर्यावरणपूरक आणि जलद वाहतूक पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
मुंबईत वॉटर मेट्रो सुरू होण्याची चर्चा सध्या वेगाने होत असली, तरी यातील अनेक तपशील अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाहीत. मात्र, प्रकल्पाला गती देण्याचे संकेत मिळत असल्याने भविष्यात हा मोठा बदल ठरू शकतो.