मुंबई : घरातील भांडण, कौटुंबिक वादविवाद, बदलत्या शहरीकरणाचे ग्लॅमर यात अनेक मुलं घरातून बाहेर पडतात. परंतु रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले रेल्वे सुरक्षा दलाच्या ( आरपीएफ) जवानांनी एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ पर्यंत ऑपरेशन नन्हे फरिश्ते मोहिमे अंतर्गत
तब्बल ९५८ मुलांची सुटका करत पालकांच्या स्वाधीन केले. आरपीएफच्या या कामगिरीचे पालकांनी कौतुक केले. दरम्यान, ९५८ मुलांमध्ये मुंबई विभागातील २८९ मुलांची सुखरूप सुटका केल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने “ऑपरेशन नन्हे फरिश्ते”अंतर्गत एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ६५५ मुले आणि ३०३ मुलींसह ९५८ मुलांची मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन फलाटांवरून सुटका केली आहे. यामध्ये चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्या बालकांचे त्यांच्या पालकांशी पुनर्भेट घडवून आणली.
एका महिन्यात ५६ मुलांची सुटका!
मध्य रेल्वेच्या आरपीएफने जानेवारी २०२४ मध्ये ३५ मुले आणि २१ मुलींसह ५६ मुलांची सुटका केली आहे. त्यापैकी एकट्या मुंबई विभागात २७ मुलांची सुटका करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेवर विभागनिहाय सुटका!
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक २८९ मुलांची सुटका केली असून त्यात १७५ मुले आणि ११४ मुलींचा समावेश आहे.
भुसावळ विभागाने २७० मुलांची सुटका केली त्यात १६९ मुले आणि १०१ मुलींचा समावेश आहे.
पुणे विभागाने २०६ मुलांची सुटका केली असून त्यात १९८ मुले आणि ८ मुलींचा समावेश आहे.
नागपूर विभागाने १३२ मुलांची सुटका केली असून त्यात ७६ मुले आणि ५६ मुलींचा समावेश आहे.
सोलापूर विभागाने ६१ मुलांची सुटका केली असून त्यात ३७ मुले आणि २४ मुलींचा समावेश आहे.