पालघर जिल्ह्यात बुधवारी (दि.२२) दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भाग जलमय झाले आहेत. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाने (IMD) पालघरसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, पावसामुळे रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली असून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
डहाणू , तलासरीत पावसाचा सर्वाधिक फटका
सोमवारपासून पालघरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. मात्र, बुधवारी दुपारनंतर पावसाचा जोर अचानक वाढला आणि रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत राहिला. डहाणू, तलासरी, बोर्डी आणि परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.
रेल्वे रुळ पाण्याखाली; पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुसळधार पावसामुळे घोलवड-उमरगाव तसेच वाणगाव-डहाणूदरम्यान रेल्वे पुलांवरून पाणी वाहू लागले. त्यामुळे रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आणि पश्चिम रेल्वेला काही काळ रेल्वे वाहतूक थांबवावी लागली.
याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही झाला असून गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या अनेक गाड्या मार्गातच थांबवण्यात आल्या. काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचा प्रवास अर्ध्यावरच संपवण्यात आला आहे. उपनगरी लोकल सेवा मर्यादित स्वरूपात सुरू असून काही गाड्या केवळ वाणगावपर्यंतच धावत आहेत.
रस्ते जलमय, वीजपुरवठाही खंडित
पालघर-बोईसरसह अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक मंदावली आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली असून वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
शाळांना सुट्टी, रेड अलर्ट कायम
सततच्या मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासही अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी आवश्यक तेवढेच घराबाहेर पडावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.