

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा धोका टळला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलीन वायूने भरलेला टँकर पलटी झाला. या अपघातामुळे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अपघाताला १५ तासांपेक्षा जास्त वेळ होऊनही वाहतूक पूर्णपणे सुरळीत न झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.
हा अपघात मंगळवारी (दि.३) सायंकाळी ५ च्या सुमारास झाला. टँकर उलटताच त्यातून वायू गळती सुरू झाली. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या टीमने घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी टँकरचा व्हॉल्व्ह बंद करण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र सुरुवातीला त्यांना यश आले नाही. त्यानंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) च्या तज्ञ टीमला मदतीसाठी बोलावण्यात आले. या रासायनिक गळतीमुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
वाहनांच्या रांगा
पुण्याकडे जाणारी वाहतूक खोपोली-खालापूर टोलनाक्यापर्यंत अडकली असून मुंबईकडे जाणारी वाहतूकीसाठी १० ते १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा रस्त्यावर पाहायला मिळत आहेत.
पोलिसांचे आवाहन
खोपोली पोलिसांनी सांगितले की, “प्रोपिलीन वायूचा टँकर उलटल्यामुळे गळती सुरू झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक रोखण्यात आली असून वाहनांना पर्यायी मार्गांवर वळवले जात आहे.”
पर्यायी मार्ग
ताम्हिणी घाट मार्ग : चांदणी चौक → ताम्हिणी घाट→ रायगड
माळशेज घाट मार्ग : पुणे → चाकण → नारायणगाव → आळे फाटा → माळशेज घाट → मुरबाड → कल्याण/ ठाणे → मुंबई
भीमाशंकर / मंचर मार्ग : पुणे → मंचर → जुन्नर → माळशेज परिसर → मुंबई
या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना करण्यात आले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांचा संताप
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांकडून वाहतूक कोंडीबाबत रोष व्यक्त केला जात आहे.
तसेच, इतर नागरिकांनी या मार्गावरून प्रवास टाळावा, असा सल्लाही पोस्टमार्फत दिला जात आहे.
वाहतूक सुरळीत कधी होणार?
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सध्या संथ गतीने वाहतूक सुरु असून वायूगळती पूर्णपणे थांबल्यावर आणि टँकर हटवल्यानंतरच एक्सप्रेसवेवरील वाहतूक सुरू केली जाईल. एक्सप्रेसवे स्वच्छ होईपर्यंत वाहतूक सुरळीत होऊ शकणार नाही.