मुंबईत राजकीय रणकंदन; विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपचे 'मूक आंदोलन' करून प्रत्युत्तर

निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने आज (दि. १) मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला आहे. या मोर्चाला प्रतिउत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजपा) गिरगाव चौपाटी येथे ‘मूक आंदोलन’ सुरू केले असून, त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे.
मुंबईत राजकीय रणकंदन; विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपचे 'मूक आंदोलन' करून प्रत्युत्तर
Published on

निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने आज (दि. १) मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला आहे. या मोर्चाला प्रतिउत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजपा) गिरगाव चौपाटी येथे ‘मूक आंदोलन’ सुरू केले असून, त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे.

सत्याचा मोर्चा

निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर आणि मतदार यादीतील गोंधळावर आक्षेप घेत हा विरोधकांनी मोर्चा आयोजित केला आहे. चर्चगेट येथील फॅशन स्ट्रीटवरून मोर्चाची सुरुवात झाली असून, तो मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत जाणार आहे. या मोर्चाला ‘सत्याचा मोर्चा’ हे नाव देण्यात आले असून, तो पुढे सभेत रुपांतरित होणार आहे.

या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शप (शरदचंद्र पवार) गटाचे नेते शरद पवार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, तसेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासह अनेक युवा नेते सहभागी झाले आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे या चार प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या एकत्र येण्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपाचं प्रत्युत्तर - गिरगाव चौपाटीवर ‘मूक आंदोलन’

या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने गिरगाव चौपाटी येथे ‘मूक आंदोलन’ सुरू केलं आहे. या आंदोलनाचं नेतृत्व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण करत आहेत. त्यांच्या सोबत मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, आमदार योगेश सागर, आमदार विद्या ठाकूर आणि प्रवक्ते नवनाथ बन यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले आहेत.

भाजपाने हे आंदोलन “महाविकास आघाडीच्या दुटप्पी राजकारणाविरोधात” असल्याचं स्पष्ट केलं आहे. दुपारी १ वाजता सुरू झालेलं हे आंदोलन ‘मूक’ स्वरूपात पार पाडण्यात येत आहे.

तीच ती स्ट्रॅटेजी आता चालणार नाही - मंगलप्रभात लोढा

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या आंदोलनादरम्यान विरोधकांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “एकदा अशी रणनिती चालते, पण वारंवार तीच तीच ‘स्ट्रॅटेजी’ चालणार नाही. विरोधकांनाही ठाऊक आहे की लोक आता त्यांच्या बाजूने नाहीत. लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या बाजूने आहेत.”

लोढा यांनी पुढे दावा केला की, फक्त मुंबई महापालिकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातही विरोधकांचा सुपडा साफ होईल. जनतेला आता कामगिरी आणि स्थिर नेतृत्व हवं आहे, असं ते म्हणाले.

राहुल नार्वेकर यांचा टोला

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या मोर्चावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, “लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार सगळ्यांनाच आहे. पण काही मोर्चे जनहितासाठी असतात तर काही स्वार्थासाठी. आजचा मोर्चा हा हेतूपुरस्कर असून, यातून जनतेचा काहीही फायदा होणार नाही,”असं नार्वेकर म्हणाले.

त्यांनी पुढे विचारलं, “लोकसभा निवडणुकीत विरोधकांना विजय मिळाला तेव्हा निवडणूक आयोग योग्य होता, पण पराभवानंतरच शंका का? हे जनता विचारणारच.” संविधानिक संस्थांवर आरोप करून ‘खोटा नरेटिव्ह’ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं.

‘सत्याचा मोर्चा’ आणि ‘मूक आंदोलन’ या दोन विरोधी कृतींमुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in