

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उद्योजक सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह उद्योगपती अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी याच्यासोबत शनिवारी (२० जून) मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये थाटामाटात पार पडला. महाराष्ट्रातील दोन प्रतिष्ठित राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील कुटुंबांच्या या विवाहसोहळ्याला देशातील उद्योगपती, राजकीय नेते आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.
लग्नसोहळ्यापूर्वी झालेल्या संगीत समारंभापासून ते मुख्य विवाहसोहळ्यापर्यंत अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या उपस्थितीने आणि त्याच्या नृत्याने या सोहळ्याला वेगळीच रंगत आणली.
अंबानी कुटुंबाची विशेष उपस्थिती
विवाहसोहळ्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटही सोहळ्यात सहभागी झाले होते.
बच्चन कुटुंबासह अनेक सेलिब्रिटींची हजेरी
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा यांनीही विवाहसोहळ्याला उपस्थिती लावली. याशिवाय अभिनेता रणबीर कपूर, सलमान खान तसेच अभिनेते आणि खासदार रवी किशन यांनीही नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
संगीत सोहळ्यात शाहरुख खानची जादू
लग्नाआधी झालेल्या संगीत सोहळ्यानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान या कार्यक्रमात विशेष पाहुणा म्हणून सहभागी झाला होता.
गायक राहुल वैद्यने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्यासोबत ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील ‘कोई मिल गया’ या गाण्यावर नृत्य करताना दिसला. त्याने रेवतीला शुभेच्छा देत तिची गळाभेट घेतली, तर सारंगसोबतही मंचावर खास क्षण घालवले.
या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून शाहरुख खानची उपस्थिती हा संगीत सोहळ्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरला.
सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या नव्या आयुष्यासाठी राजकीय नेते, उद्योगपती, कलाकार आणि चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
अंबानी कुटुंब, बच्चन कुटुंब, शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा विवाहसोहळा केवळ कौटुंबिक सोहळा न राहता देशभर चर्चेचा विषय ठरला आहे.