वसई-विरार परिसरातील धोकादायक आणि जीर्ण इमारतींच्या स्लॅब कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असताना बुधवारी रात्री विरार (पश्चिम) येथील विराट नगर परिसरात पुन्हा अशीच एक गंभीर घटना घडली. रात्री सुमारे ८ वाजता आदिनाथ सोसायटी इमारतीचा काही भाग कोसळताच परिसरात भीती आणि गोंधळ निर्माण झाला.
३० वर्षांची इमारत पूर्णपणे जीर्ण
विराट नगरमधील 'आदिनाथ सोसायटी' ही सुमारे ३० वर्षे जुनी इमारत असून ती आता अत्यंत जीर्ण झाली आहे. बुधवारी रात्री अचानक स्लॅबचा भाग कोसळताच नागरिक घाबरून बाहेर पडले. माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशामक दलासोबत बोळींज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण इमारत त्वरित रिकामी करण्यात आली.
सुदैवाने जीवितहानी नाही; ६ महिन्यांपूर्वीच नोटीस
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेने सहा महिन्यांपूर्वीच ही इमारत ‘धोकादायक’ म्हणून घोषित करून नोटीस दिली होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने रहिवाशांचे तत्काळ स्थलांतर करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे.
या वर्षात वसई-विरार शहरात धोकादायक, जुन्या इमारतींच्या स्लॅब कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात या नव्या घटनेमुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
"महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळेच दुर्घटना" - स्थानिकांचा आरोप
नागरिकांचे म्हणणे आहे की शहरात अशा घटना वारंवार घडत असूनही महानगरपालिकेकडून योग्य तपासणी केली जात नाही. अनेक इमारतींना धोकादायक म्हणून नोटिसा दिल्या जातात, मात्र त्या इमारतींची प्रत्यक्ष दुरुस्ती झाली आहे की नाही, याची योग्य पाहणी होत नाही. पालिकेच्या या दुर्लक्षामुळेच अशा दुर्घटना घडत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.