विदेशी गुंतवणूक संस्थांनी गेले दोन महिने भांडवली बाजारात गुंतवणूक केली; मात्र भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबरमध्ये तब्बल ७,६०० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री करुन त्यांनी पैसे काढून घेतले. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानंतर आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येते.
यंदा २०२२ मध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूक संस्थांनी १.६८ लाख कोटी रुपये काढून घेतल्याचे शेअर बाजारातील आकडेवारीवरून दिसून येते. जागतिक आणि देशांतर्गत बाजारातील वातावरण पाहता आगामी महिन्यातही विदेशी संस्थांतील गुंतवणूक दोलायमान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशातील इंधनाचे वाढते दर आणि जीडीपीमध्ये किंचित घट या मुद्द्यांचा देशांतर्गत बाजारावर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.