
अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानी नगरच्या रहिवाशी परिसरात एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान कोसळले. या विमानात एकूण २४२ जण प्रवास करत होते.
दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी विमानाने टेक-ऑफ केले. त्यानंतर काहीच मिनिटांत ते कोसळले. एनआयने दिलेल्या माहितीनुसार हे विमान डॉक्टरांच्या वसतीगृहावर कोसळले आहे.
या वेळी डॉक्टर आणि विद्यार्थी दुपारच्या जेवणासाठी कँटिनमध्ये बसले होते. भरल्या ताटावरच त्यांच्या समोर मृत्यू उभा राहिला. मृतांमध्ये डॉक्टर आणि विद्यार्थी असण्याचीही भीती वर्तवली जात आहे.
वसतीगृहाच्या इमारतीमध्ये हे विमान भिंतींना भगदाड पाडून घुसले. अनेक खोलीच्या भिंती, खांब, छपर पडले असून ही इमारत धोकादायक स्थितीत आहे. घटनेनंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले.
अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता निघालेल्या या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स प्रवास करत होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगीज नागरिक आणि १ कॅनेडाचा नागरिक प्रवास करत होते. तर, २ पायलट आणि १० कर्मचारी प्रवास करत होते.
विमानाने उड्डाण घेतल्यावर पायलटने अपघातापूर्वी जवळच्या एटीसीला एक धोक्याचा सिग्नल पाठवला होता. पण, त्यानंतर काही क्षणांतच विमान कोसळले.
या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करत होते. तर काही उद्योगपती देखील होते. तसेच लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेमध्ये अजूनही मृतांचा आणि जखमींचा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही.