लोकसभेत निवडणूक सुधार प्रक्रियेवरील चर्चेदरम्यान आज (१० डिसेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या ‘वोट चोरी’च्या मुद्द्यावर जोरदार पलटवार केला. राहुल गांधी यांनी सातत्याने ‘वोट चोरी’चा आरोप केल्यानंतर शहा यांनी इतिहासातील काही प्रसंग उदाहरण म्हणून मांडत हा आरोप उलट विरोधकांवरच वळवला.
अमित शहा म्हणाले की, ‘वोट चोरी’ तीन प्रकारे होऊ शकते. एक म्हणजे पात्र नसलेल्यांकडून मतदान होणे. दुसरं म्हणजे अवैध मार्गाने निवडणूक जिंकणे आणि तिसरं म्हणजे जनादेश नाकारून पद स्वीकारणे.
नेहरू-पटेल निवडीवरून ऐतिहासिक संदर्भ
शहा म्हणाले की, "स्वातंत्र्यानंतर पहिली "वोट चोरी" झाली तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांना अधिक समर्थन असतानाही पंडित जवाहरलाल नेहरू यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. सरदार पटेल यांना २८ तर नेहरूंना केवळ दोन मतं मिळाली होती."
इंदिरा गांधींची रायबरेली निवडणूक
दुसरे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, "इंदिरा गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातील निवडणुकीतील अनियमितता अलाहाबाद उच्च न्यायालयाने मान्य केली होती." त्या प्रकरणालाही शहा यांनी ‘वोट चोरी’शी जोडले.
सोनिया गांधी प्रकरणाचा उल्लेख
तिसरे उदाहरण देताना शहा म्हणाले की, "सोनिया गांधी यांच्या काळात नागरिकत्व नसतानाही काही व्यक्ती मतदार म्हणून नोंदवल्या गेल्याचा मुद्दा न्यायालयात गेला होता." हेही ‘वोट चोरी’चे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधींवर अप्रत्यक्ष निशाणा
राहुल गांधी यांनी अलीकडेच ‘वोट चोरी’चा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला होता. त्यावर पलटवार करत शहा म्हणाले की, विरोधकांनी जे आरोप केले, त्याच प्रकारचे प्रसंग इतिहासात त्यांच्या नेतृत्वाखाली घडले आहेत.