

नरसन्नापेटा: आंध्र प्रदेशातील घटती लोकसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी ३० हजार रुपये आणि चौथ्या अपत्यासाठी ४० हजार रुपयांची रोख प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी केली.
श्रीकाकुलम जिल्ह्यातील नरसन्नापेटा येथे आयोजित एका जाहीर सभेत ते बोलत होते. या संदर्भातील सविस्तर तपशील एका महिन्याच्या आत जाहीर केला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
'स्वर्णाध्र-स्वच्छांध्र' स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हा नवीन निर्णय जाहीर केला. आपण पूर्वी लोकसंख्या नियंत्रणाचे समर्थन केले असले, तरी आता जन्मदर वाढवण्यासाठी समाजाने एकत्र येऊन काम करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन नायडू यांनी केले. आंध्र प्रदेश सरकारने यापूर्वी दुसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी २५ हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
लोकसंख्या वाढीचा दर घसरला
आंध्रचा लोकसंख्या वाढीचा दर घसरत आहे. प्रति महिला सरासरी २.१ मुले हा प्रजनन दर राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक देशांमध्ये लोकसंख्या घटल्यामुळे आणि वृद्धांची संख्या वाढल्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला आहे. मुले हे ओझे नसून देशाची मालमत्ता आहेत आणि आपण हे सिद्ध करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.