तेराव्याच्या जेवणातील रायता खाणं पडलं महागात; रेबीजच्या भीतीने गावकरी रुग्णालयात, नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील पिपरौली गावात म्हशीच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. कुत्र्याने चावलेल्या म्हशीच्या दुधाचा वापर तेराव्याच्या जेवणासाठी करण्यात आल्याची माहिती समोर येताच रेबीजच्या भीतीने तब्बल २०० हून अधिक ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेत लसीकरण करून घेतले.
तेराव्याच्या जेवणातील रायता खाणं पडलं महागात; रेबीजच्या भीतीने गावकरी रुग्णालयात, नेमकं काय घडलं?
एआयने बनविलेली प्रतिमा
Published on

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील पिपरौली गावात म्हशीच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. कुत्र्याने चावलेल्या म्हशीच्या दुधाचा वापर तेराव्याच्या जेवणासाठी करण्यात आल्याची माहिती समोर येताच रेबीजच्या भीतीने तब्बल २०० हून अधिक ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेत लसीकरण करून घेतले.

नेमकं काय घडलं?

पिपरौली गावात २३ डिसेंबर २०२५ रोजी एका ग्रामस्थाच्या तेराव्याचे जेवण ठेवण्यात आले होते. या जेवणासाठी मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. जेवणात इतर पदार्थांसह रायता वाढण्यात आला होता. तो रायता अनेकांनी खाल्ला.

कुत्र्याच्या चाव्यानंतर म्हशीचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या म्हशीच्या दुधाचा वापर रायता तयार करण्यासाठी करण्यात आला होता, त्या म्हशीला काही दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता. त्यानंतर काही दिवसांतच ती म्हैस आजारी पडली आणि २६ डिसेंबर २०२५ रोजी तिचा मृत्यू झाला. नंतर समोर आले की, संबंधित म्हशीचे दूध इतर म्हशींच्या दुधात मिसळून तो रायता तयार करण्यात आला होता. ही माहिती गावात पसरताच ‘आपण खाल्लेला रायता धोकादायक तर नाही ना?’ या शंकेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

आरोग्य केंद्रात एकाच वेळी गर्दी

भीतीपोटी शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने गावकरी उझानी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात पोहोचले. खबरदारी म्हणून रेबीज लसीकरणाची मागणी करण्यात आली. एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने काही काळ रुग्णालय परिसरात गोंधळाचे वातावरण होते.

सुमारे २०० गावकऱ्यांचे लसीकरण

आरोग्य विभागाकडून जशोदा, धरमपाल, कौशल कुमार, अनमोल, कमलेश, मोनिका, सर्वेश, संगीता यांच्यासह सुमारे २०० ग्रामस्थांना रेबीजची लस देण्यात आली. डॉक्टरांनी दुधामार्फत रेबीज पसरण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट केले. मात्र ग्रामस्थांमधील भीती लक्षात घेऊन खबरदारी म्हणून लसीकरण करण्यात आले.

लसीकरणानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सध्या गावातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कोणालाही आजाराची लक्षणे आढळलेली नाहीत. आरोग्य विभागाचे पथक गावात लक्ष ठेवून असून, अफवा पसरू नयेत यासाठी जनजागृती केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in