
नुकत्याच मुंबईविरुद्ध झालेल्या रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात खेळाडूंच्या जेवणावर तब्बल १.७४ कोटी रुपये खर्च करण्यात आले, असा दावा उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, क्रिकेटपटूंच्या जेवणाचे हे बिल पाहून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अधिकारी चक्रावून गेल्याचे सांगण्यात येते.
बीसीसीआय सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटन असल्याचे सर्वश्रुत आहे; परंतु रणजी करंडकाच्या यंदाच्या हंगामात खेळाडूंवर झालेल्या अव्वाच्या सव्वा खर्चामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ एक खेळाडू नव्हे, तर संपूर्ण संघ या वादात अडकला आहे.
उत्तराखंडवर मुंबईने ७२५ धावांनी विक्रमी विजय मिळवित उपांत्य फेरीत धडक मारली. त्यानंतर काही वेळातच खर्चाबाबत खळबळजनक बातमी येताच उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनला स्पष्टीकरण द्यावे लागले.
मीडिया रिपोर्टनुसार लाखो रुपये खर्च केल्याचे दाखविणाऱ्या उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनकडून उत्तराखंडच्या टीममधील खेळाडूंना केवळ १०० रुपये दैनिक भत्ता दिला जातो. उत्तराखंडने या आरोपाला फेटाळून लावले; मात्र खेळाडूंचा खाण्यावरील खर्चाच्या दाव्यामुळे मात्र सारेच अचंबित झाले.
उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, खेळाडूंच्या जेवणावर १.७४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. खेळाडूंना देण्यात येणाऱ्या दैनिक भत्त्यावर एकूण ४९ लाख ५८ हजार रुपये खर्च केला गेला.