बिहारमधील नालंदा येथे मंगळवारी (दि. ३१) सकाळी शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ८ महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आलेला अभाव आणि योग्य नियोजन नसल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचे समोर येत आहे.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मंदिरात प्रवेश करण्यासाठी जागाच उरली नव्हती. अनेक भाविक उपाशीपोटी आणि उष्णतेत रांगेत उभे असल्याने काहींची प्रकृती बिघडली, तर काहीजण बेशुद्ध पडले. याच गोंधळात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.
"लोक एकमेकांवर पडत होते..." प्रत्यक्षदर्शींनी सांगितले
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले, “मंदिरात प्रचंड गर्दी होती. आत जाण्यासाठी जागा नव्हती. उन्हामुळे आणि उपाशीपोटी आल्यामुळे अनेकांची प्रकृती बिघडली. रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली.
पटणाहून आलेल्या एका महिलेने सांगितले, “आम्ही चौघीजणी एकत्र आलो होतो; मात्र गोंधळात एकमेकींपासून वेगळ्या झालो. लोक एकमेकांवर पडत होते,” असे सांगताना ती भावूक झाली.
बचावकार्य सुरू, तपासही सुरू
घटनेनंतर तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपासही सुरू करण्यात आला आहे.