

लग्न ठरणं, साखरपुडा होणं आणि काही दिवसांतच क्षुल्लक कारण देत नातं तोडणं, अशा घटना अनेकदा समोर येतात. मात्र, बिहारमधील मुजफ्फरपूर येथे घडलेल्या एका प्रकाराने अनेकांना संताप व्यक्त करायला भाग पाडलं आहे. "मुलीचे केस कमी आहेत" असं कारण देत नवरदेव पक्षाने साखरपुडा मोडला. मात्र, यामागे हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याचं कारण असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
साखरपुड्यानंतर अचानक बदलली भूमिका
मिळालेल्या माहितीनुसार, मिठनसराय मुस्तफापूर येथील एका तरुणीचा विवाह वैशाली जिल्ह्यातील चेहराकला येथील तरुणासोबत ठरला होता. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी एका हॉटेलमध्ये दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला.
पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, साखरपुड्यावेळी सोन्याचे दागिने, कपडे आणि रोख रक्कम देण्यात आली होती. तसेच लग्नाच्या तयारीसाठी आगाऊ पैशांचाही व्यवहार करण्यात आला होता. साखरपुड्यापर्यंत सुमारे १४ लाख रुपयांहून अधिक खर्च झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी नवरदेवाच्या घरातून फोन आला आणि लग्न होऊ शकत नसल्याचं सांगण्यात आलं.
"मुलीचे केस कमी आहेत"
कुटुंबीयांच्या आरोपानुसार, नवरदेवाच्या बहिणीने फोन करून "मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत आणि तिचे केस गळत आहेत," असं कारण पुढे केलं. मात्र, मुलीच्या आईने हा दावा फेटाळून लावत, हे केवळ लग्न मोडण्यासाठी दिलेलं कारण असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या आरोपानुसार, नवरदेव पक्षाने हुंड्यात वॅगनआर कारची मागणी केली होती. ती मागणी पूर्ण होत नसल्याचं लक्षात आल्यानंतरच केसांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
“आधी कधीच आक्षेप नव्हता”
पीडित कुटुंबाने तक्रारीत नमूद केलं आहे की, साखरपुड्यापूर्वी दोन्ही कुटुंबांमध्ये अनेकदा भेटीगाठी झाल्या होत्या. त्यावेळी मुलीच्या केसांबाबत किंवा दिसण्याबाबत कोणताही आक्षेप घेण्यात आला नव्हता. हुंडा न मिळाल्यामुळेच मुलीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पोलिसांत तक्रार
या प्रकारामुळे संबंधित तरुणीला मोठा मानसिक धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. पीडितेच्या आईने महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी हुंडा छळ, फसवणूक आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. सिटी एसपी मोहिबुल्लाह अन्सारी यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं असून, पुराव्यांच्या आधारे आरोपींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली आहे.