हिमाचल प्रदेशात २४ जून रोजी पावसाचे आगमन झाले आणि अवघ्या २४ तासांत निसर्गाचा भीषण कहर पाहायला मिळाला. २५ जून रोजी कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यांत पाच ठिकाणी ढगफुटी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. नद्यांनी उग्र रूप धारण करत घरे, दुकाने, वाहने आणि पूल पाण्यात वाहून गेले. या दुर्घटनेत किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून, नऊहून अधिक जण बेपत्ता आहेत. विशेषतः मनाली, सैंज, सोलांगनाला आणि खनियारा परिसरात मोठं नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत व शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, हवामान विभागाने २८ व २९ जूनसाठी पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, ढगफुटीची दृश्यं सोशल मीडियावरून समोर येत असून ती अतिशय भयावह आहेत.
सैंज, बंजारा, तरथन (कुल्लू), सोलंगनाला (मनाली) आणि मणिकरण व्हॅली या भागांतील पर्वतांवर ढगफुटी झाली आहे.
ढगफुटीनंतर नद्यांचे पाणी अचानक वाढल्याने अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, पर्यटक व स्थानिकांचा जीव धोक्यात आला आहे.
मनालीतील जलविद्युत प्रकल्पासाठी बांधलेले कर्मचारी निवास शेड पुरात वाहून गेले आहेत. एक संपूर्ण कुटुंब पाण्यात वाहून गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.
कांगडामधील खनियारा येथे इंदिरा प्रियदर्शिनी जलविद्युत प्रकल्पाजवळील कामगार वसाहतीत सुमारे ८ कामगार पुरात वाहून गेले. सुरुवातीला संख्या १५-२० सांगितली गेली होती, परंतु प्रशासनाने नंतर यावर स्पष्टता दिली.
प्रशासन, एनडीआरएफ आणि स्थानिक बचावपथक घटनास्थळी मदत आणि शोधमोहीम राबवत आहेत. हवामान विभागाने २८ आणि २९ जूनसाठी पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट जारी केला असून, आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.