आसाममधील जोरहाट एअर फोर्स स्टेशनवर शनिवारी (दि.१३) झालेल्या AN-32 लष्करी वाहतूक विमानाच्या दुर्घटनेत भारतीय हवाई दलाच्या पाच जवानांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने मृत जवानांची नावे जाहीर करत त्यांना कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिल्याचे म्हटले आहे. या दुर्घटनेत सहवैमानिक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हवाई दलाने जाहीर केली मृत जवानांची नावे
भारतीय हवाई दलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायू दानिश आलम यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
हवाई दलाने मृत जवानांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत, "कर्तव्य बजावताना त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले," असे म्हटले आहे.
लँडिंगदरम्यान तांत्रिक बिघाड
प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी जोरहाट एअर फोर्स स्टेशनमधील रोवरिया हवाई पट्टीवर उतरण्याच्या तयारीत असताना विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यानंतर विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाले आणि त्याला आग लागली. घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. तातडीने अग्निशमन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली.
सहवैमानिक बचावला
या दुर्घटनेत विमानातील सहवैमानिक बचावला असून तो जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र विमानातील अन्य पाच जणांचा मृत्यू झाला.
चौकशीचे आदेश
या दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाने 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश दिले आहेत. विमानाची तांत्रिक स्थिती, लँडिंगदरम्यान घडलेल्या घटना आणि इतर कार्यकारी बाबींची सखोल चौकशी केली जाणार आहे.
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांची प्रतिक्रिया
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनीही दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवालाची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरातून श्रद्धांजली
या दुर्घटनेनंतर देशभरातून हवाई दलाच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या जवानांच्या शौर्याला आणि सेवेला विविध स्तरांतून सलाम करण्यात येत आहे.