झारखंड : रुग्णालयाचा निष्काळजीपणा? थॅलेसेमियाग्रस्त ५ मुलांना HIV ची लागण; दूषित रक्त चढवल्याचा धक्कादायक आरोप

झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासा येथील सदर रुग्णालयातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. थॅलेसेमियाने (Thalassemia) ग्रस्त असलेल्या किमान ५ अल्पवयीन मुलांना रक्त संक्रमणानंतर HIV चा संसर्ग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
झारखंड : रुग्णालयाचा निष्काळजीपणा? थॅलेसेमियाग्रस्त ५ मुलांना HIV ची लागण; दूषित रक्त चढवल्याचा धक्कादायक आरोप
Published on

झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासा येथील सदर रुग्णालयातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. थॅलेसेमियाने (Thalassemia) ग्रस्त असलेल्या किमान ५ अल्पवयीन मुलांना रक्त संक्रमणानंतर HIV चा संसर्ग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्यात आरोग्य यंत्रणेची मोठी खळबळ उडाली असून, आरोग्य विभागाने उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे.

फॉलो-अप चाचणीत धक्कादायक निकाल

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रक्त संक्रमण झाल्यानंतर एका मुलाची १८ ऑक्टोबर रोजी फॉलो-अप चाचणी घेण्यात आली, तेव्हा तो HIV पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेनंतर संबंधित मुलाच्या वडिलांनी रक्तपेढीतील तंत्रज्ञाविरुद्ध निष्काळजीपणाची तक्रार दाखल केली. माध्यमांमध्ये ही बातमी समोर आल्यानंतर, झारखंड उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि चौकशीसाठी झारखंड राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या (JSACS) पथकाला चाईबासा येथे पाठवले.

तपासात आणखी चौघांना HIV

२५ ऑक्टोबर रोजी आरोग्य सेवा संचालक डॉ. दिनेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सदर रुग्णालयाला भेट दिली. तपासादरम्यान आणखी ४ अल्पवयीन रुग्ण HIV पॉझिटिव्ह आढळले, ज्यामुळे एकूण बाधित मुलांची संख्या ५ झाली आहे.

तपासणीतील प्राथमिक निष्कर्ष

डॉ. कुमार यांनी सांगितले की, प्राथमिक तपासणीत थॅलेसेमिया रुग्णांना दूषित रक्त देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. तपासादरम्यान रक्तपेढीत काही विसंगती आढळून आल्या असून, त्या दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्जन डॉ. सुशांतो यांनीही सांगितले की, संसर्गाची कारणमीमांसा अद्याप सुरू आहे. "HIV संसर्ग फक्त दूषित रक्तातूनच नव्हे, तर दूषित सुयांच्या संपर्कातून किंवा इतर घटकांमुळेही होऊ शकतो," असे त्यांनी नमूद केले.

आरोग्य प्रशासनाचा पुढील तपास

उपायुक्त चंदन कुमार यांनी सांगितले की, या मुलांना दर १५ ते ३० दिवसांनी रक्त चढवले जात होते आणि प्रशासन सध्या तीन पातळ्यांवर तपास करत आहे. पुढील तपासणीत निकालाची खात्री करणे, रक्तदात्यांचा डेटाबेस तपासणे, संक्रमणाचे मूळ दूषित रक्तदात्यापासून आहे का, हे निश्चित करणे. ते म्हणाले की, पाचही मुलांचे रक्तगट वेगवेगळे असल्याने संक्रमण एकाच रक्तदात्याकडून नाही, तर विविध स्त्रोतांमधून झाले असण्याची शक्यता आहे.

संक्रमित मुलांपैकी ३ मुले आदिवासी कुटुंबांतील आहेत. सर्व मुलांना सध्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. सदर जिल्ह्यात सध्या ५१५ HIV पॉझिटिव्ह रुग्ण आणि ५६ थॅलेसेमिया रुग्ण आहेत. या प्रकरणातील चौकशी पथकात डॉ. शिप्रा दास, डॉ. एस. एस. पासवान, डॉ. भगत, डॉ. शिवचरण आणि डॉ. मिनु कुमारी यांचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण झारखंडच नव्हे तर देशभरात रक्तसुरक्षेच्या निकषांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in