

हैदराबाद : पोक्सो गुन्ह्याखाली मुलगा भगीरथ याला अटक झाल्यानंतर केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी बीआरएसचे कार्याध्यक्ष के टी रामा राव यांनी रविवारी केली. केंद्रीय मंत्री पदावर राहिल्यास या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणे अशक्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री भगीरथला ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत पाठवले. एका १७ वर्षीय मुलीच्या छळाप्रकरणी ८ मे रोजी हा गुन्हा दाखल झाला होता.
आरोपी ९ दिवस कुठे लपला होता आणि त्याला कोणी संरक्षण दिले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या कारवाईसाठी बीआरएस महिला आघाडीने राज्यभर आंदोलने केली असून पारदर्शक तपासाची मागणी केली आहे.