
उत्तराखंडमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हरिद्वारमध्ये आज (२७ जुलै) सकाळी मोठा अपघात घडला. मानसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याने सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, ३५ भाविक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अफवेमुळे निर्माण झाला गोंधळ
ही घटना सकाळी ९ च्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, मंदिराच्या पायऱ्यांवर वीज प्रवाहित होत असल्याची अफवा गर्दीत पसरली. यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आणि लोकं सैरावैरा पळू लागले. या धावपळीतच चेंगराचेंगरी झाली.
गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले की, “चेंगराचेंगरीमुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची सविस्तर चौकशी सुरू आहे.” तर, हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रमेंद्र सिंह डोबाल यांनीही घटनेची पुष्टी करत ३५ जण जखमी झाल्याचे सांगितले.
जखमींना तातडीने हरिद्वारच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अनेकांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, “या अपघाताची चौकशी सुरू असून अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मी सर्व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.