

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. मंत्रालयाने अनेक हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून या माहितीची पुष्टी केली.
युद्धामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे मध्य-पूर्वेतील देशांतून भारतीय नागरिकांचे मायदेशी परतणे सुरूच आहे. मंगळवारी उशिरा रात्री जेद्दाह आणि दुबई येथून अनेक भारतीय नागरिक दिल्ली, अहमदाबाद आणि हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर पोहोचले. भारतात परतल्यानंतर प्रवाशांनी सांगितले की, मायदेशात परत येऊन आनंद होत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा ‘होर्मुझ’ मार्ग बंद केला आहे. त्यामुळे भारतीय ध्वज असलेली ३७ जहाजे आणि त्यावरील १,१०९ भारतीय खलाशी सध्या पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातात अडकले आहेत. युद्धामुळे पश्चिम आशियातील ८ देशांनी हवाई हद्द पूर्णपणे बंद केली आहे. २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत भारतीय एअरलाइन्सने १,११७ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामुळे हजारो प्रवासी विमानतळावर अडकले आहेत.
संकटातून परतले २०० भारतीय
पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे हवाई क्षेत्रावरील निर्बंध कायम असताना, जेद्दाहहून इंडिगोच्या विशेष मदत विमानाने सुमारे २०० भारतीय नागरिकांना परत आणले. परत आलेल्यांनी त्यांचे सुरक्षित स्थलांतर सुलभ केल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले. रात्री उशिरा हे विमान गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. जेद्दाहमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्याच्या विशेष प्रयत्नांचा हा एक भाग होता, या मार्गावर अनेक विमान कंपन्यांनी मदत सेवा तैनात केल्या होत्या.
सरकारचे मानले आभार
‘भारतात आल्यानंतर आम्हाला आमच्या मायदेशी परतल्यासारखे वाटले. आता आम्हाला खूप शांती आणि दिलासा वाटतो. सरकारने खूप चांगले काम केले आहे; आमच्या सुरक्षित परतीसाठी विमानांची व्यवस्था केल्याबद्दल आम्ही सरकारचे आभार मानतो,’ असे एका प्रवाशाने सांगितले. ‘दूतावासाने आम्हाला खूप मदत केली. सरकारने आम्हाला दिलेल्या सर्व सहकार्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत," असे परतलेल्या व्यक्तीने सांगितले. ‘सरकारने आम्हाला खूप मदत केली. अन्यथा, आम्हाला ठाऊक नव्हते की आम्ही घरी कसे परतू? त्यांनी आमच्यासाठी एक विशेष विमान पाठवले आणि आम्ही त्या विमानाने परत आलो’, असे आयएएनएसशी बोलताना या प्रवाशाने स्पष्ट केले.