

हैदराबाद : देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांची ओळख पटवून त्यांची हकालपट्टी करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये देश आपापल्या हितसंबंधांनुसारच वागत असतात, असे निरीक्षण नोंदवत भारतानेही कोणताही तडजोड न करता आपला स्वतंत्र मार्ग ठरवायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय घडामोडींना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी देश आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.
‘संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासातील नवे क्षितिजे’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते. या कार्यक्रमाला निवडक निमंत्रित उपस्थित होते. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहर दौऱ्यावर असताना त्यांनी चित्रपटसृष्टीतील व्यक्ती आणि ज्येष्ठ नोकरशहांचीही भेट घेतल्याचे संघाने सोमवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
बेकायदेशीररीत्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे देशात होणाऱ्या घुसखोरीबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की अशा बेकायदेशीर स्थलांतरितांची ओळख पटवून त्यांची हकालपट्टी करणे ही सरकारची जबाबदारी आहे; नागरिकांनीही संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणू शकतात.
जगात होणाऱ्या ‘उलथापालथी’चे परिणाम भारतावर किमान प्रमाणातच होतील, कारण भारतातील कुटुंबव्यवस्था, सोन्याची बचत आणि देशातील आर्थिक उपक्रम हे कुटुंबकेंद्रित असल्याचे त्यांनी नमूद केले.
संघ समजून घ्यायचा असेल, तर संघाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे, असे सांगत त्यांनी वरवर पाहून संघ समजून घेतल्यास गैरसमजही होऊ शकतो, असे म्हटले. राष्ट्रनिर्मितीत नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून सरकारे, पक्ष आणि नेते आपापली भूमिका बजावत असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘उत्कृष्ट राष्ट्रनिर्मितीच्या उद्देशाने व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणे हेच संघाचे तत्त्व आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संघाने मांडलेल्या ‘पंच परिवर्तन’ संकल्पनेवरही त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. कुटुंब प्रबोधन (भजन आदी), पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, स्वदेशी आणि नागरी कर्तव्ये- या पाच घटकांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.