

नवी दिल्ली : येत्या २१ जून रोजी होणारी नीट-यूजी फेरपरीक्षा त्रुटीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्व तयारी पूर्ण केली असून पूर्वीच्या चुका होऊ दिल्या जाणार नाहीत अशी ग्वाही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी दिली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही चिंतेविना केवळ आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या मुख्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर प्रधान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते परीक्षा केंद्रांपर्यंत त्या सुरक्षित पोहोचवण्यापर्यंत या वेळी विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
'सीईआरटी-इन', 'आयफोरसी', गुप्तचर विभाग, सीबीआय आणि गृह मंत्रालय यांसारख्या सर्व प्रमुख संस्था सायबर सुरक्षेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असे त्यांनी नमूद केले. ही फेरपरीक्षा देशातील ५५१ शहरांमध्ये ५,४३५ केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. यामध्ये भारताबाहेरील १४ केंद्रांचाही समावेश आहे. या परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर केले जातील.