

नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात उष्णतेची लाट आली आहे. कडक ऊन आणि उष्ण वारे, अशा हवामानात स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी पीत राहा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १३४ व्या भागात सांगितले की, यंदा बहुतांश भागांत प्रचंड उष्णता पडत आहे. आपल्याकडे उष्णतेचा सामना करण्याचा मार्ग अनेकदा स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढते, तसतशी स्वयंपाकघराची चव बदलते, स्वयंपाकाचा प्रकार बदलतो. कुठे माठातले पाणी बाहेर येते, कुठे दही विरजायला लागते, तर कुठे कैरी उकडली जाते आणि मग देशी पेयांचा काळ सुरू होतो. भारतातील पारंपरिक पेये ताक, पन्हे पित जा. सतत पाणी पित राहा, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय विक्रम मोडीत काढणारे धावपटू गुरिंदरवीर सिंग आणि अनिमेष कुजूर यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
केरळमधील पोहण्याचा अनोखा उपक्रम
केरळमधील साजी वलशेरील यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या एका स्विमिंग क्लबचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींसह १५,००० हून अधिक लोकांनी येथे पोहणे शिकले आहे. साजीजींनी दिव्यांग मुलांनाही पोहणे शिकवले आहे. पण या प्रयत्नामागे एक छुपे दुःखही दडलेले आहे, असे मोदी म्हणाले.
खगोलशास्त्राने भारतीय पिढ्यांना नेहमीच भुरळ घातली असल्याचे सांगत पंतप्रधानांनी बंगळुरू अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने ग्रामीण भागात या विषयाचा प्रसार करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचे कौतुक केले.
शिक्षिका गिरिजा अम्मा यांचे देशप्रेम
मोदींनी तमिळनाडूतील नागरकोईल येथील शिक्षिका गिरिजा अम्मा यांची माहिती दिली. त्या चेन्नईतील 'जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालय'सह १५ शाळा चालवतात. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्याकडून सैनिकांसाठी दररोज एक रुपया योगदान देण्यास सांगितले. याचा अर्थ प्रत्येक विद्यार्थ्याने वर्षाला ३६५ रुपये जमा केले. या लहान योगदानातून सुमारे ४० लाख रुपये गोळा झाले,’ असे मोदी म्हणाले.