जालंधर - 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर अवघ्या दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालंधरमधील आदमपूर एअरबेसला अचानक भेट देऊन पाकिस्तानच्या खोट्या दाव्याला थेट उत्तर दिलं आहे. पाकिस्तानने १२ मे रोजी या एअरबेसवर हल्ला करून तो नष्ट केल्याचा दावा केला होता. मात्र, १३ मे रोजी मोदींनी स्वत: तिथे पोहोचून हे सर्व थोतांड असल्याचं सिद्ध केलं.
पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान त्यांच्या मागे दिसणारे 'मिग-29 लढाऊ विमान' आणि 'एस-400 'सुदर्शन चक्र' हवाई संरक्षण प्रणाली' हे भारताच्या अचल सामर्थ्याचं प्रतीक ठरले. या दृश्यांनी केवळ पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला धक्का बसला नाही, तर संपूर्ण जगासमोर भारताचं संरक्षणक्षेत्र किती सक्षम आहे, हे अधोरेखित झालं.
पाकिस्तानचा आदमपूर एअरबेस नष्ट केल्याचा दावा
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानने आदमपूर एअरबेसवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला होता. मात्र, एस-400 प्रणालीने हा हल्ला निष्फळ ठरवला. यानंतर पाकिस्तानने बनावट उपग्रह छायाचित्रे व व्हिडिओ व्हायरल करत भारताचं नुकसान झाल्याचा खोटा प्रचार सुरु केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना म्हंटले, कि -
"ते भित्र्यासारखे लपून आले पण ते विसरले की ज्याला त्यांनी आव्हान दिले होते ते भारतीय सैन्य होते. तुम्ही समोरून हल्ला करून त्यांना ठार मारले. तुम्ही सर्व दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ९ अड्डे उद्ध्वस्त झाले आणि १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. दहशतीच्या सूत्रधारांना आता समजले आहे की भारताकडे डोळेझाक करण्याचा एकच परिणाम होईल आणि तो म्हणजे विनाश."
"दहशतवादाविरुद्ध भारताची लक्ष्मणरेषा आता अगदी स्पष्ट आहे. जर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला तर भारत त्याला प्रत्युत्तर देईल, जोरदार प्रत्युत्तर देईल... आता 'ऑपरेशन सिंदूर' हे भारताचे 'न्यू नॉर्मल' ठरलं आहे.."
“जेव्हा आमच्या माता-भगिणींच्या माथ्यावरचे कुंकू हिसकावून घेतले गेले, तेव्हा आम्ही दहशतवाद्यांच्या घरात घुसून प्रतिकार केला.''
पण, पंतप्रधान मोदींच्या या दौर्यामुळे पाकिस्तानचा हा डाव उधळून लावण्यात आला. त्यांनी सैनिकांशी संवाद साधत त्यांचं मनोबल उंचावलं, तसेच ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी वातावरण भारावून टाकलं. तसेच पंतप्रधान मोदी यांनी म्हंट्लं कि घोषणा केवळ उत्साह नव्हे, तर शेजारच्या देशाला एक स्पष्ट इशारा आहे, कि भारत आपल्या लष्कराच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. या भेटीद्वारे मोदी यांनी जगासमोर आपली सामरिक ताकद, तत्परता आणि देशभक्ती यांचा ठळक संदेशही दिला आहे.