

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवल्यानंतर खासदार राघव चढ्ढा आणि पक्ष नेतृत्व यांच्यातील संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. "मला शांत करण्यात आले आहे, पण मी पराभूत झालेलो नाही," अशा शब्दांत चढ्ढा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, तर दुसरीकडे, 'आप'ने चड्ढा यांच्यावर केंद्राविरोधातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून पळ काढल्याचा आणि केवळ 'सॉफ्ट पीआर' (प्रसिद्धी) करण्यात मग्न असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर करत चढ्ढा यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, ज्यांनी माझा संसदेत बोलण्याचा अधिकार हिरावून घेतला आहे, त्यांनी माझ्या शांततेला माझा पराभव समजू नये. मी ती नदी आहे, जी वेळ आल्यावर महापुरात रूपांतरित होऊ शकते. चढ्ढा यांनी असा दावा केला की, त्यांनी जनतेचे प्रश्न मांडले आहेत. विमानतळावरील महागडे खाद्यपदार्थ, फूड डिलिव्हरी बॉईजच्या समस्या, भेसळयुक्त अन्न, टोल प्लाझा शुल्क यांसारख्या विषयांवर आवाज उठवणे हा गुन्हा आहे का, असा सवालही त्यांनी विचारला.
राजकीय अडगळीत
राघव चढ्ढा यांची राज्यसभेतील उपनेतेपदावरून हकालपट्टी करून त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चढ्ढा यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवली होती. उत्पादन शुल्क प्रकरणात केजरीवाल आणि सिसोदिया यांची न्यायालयाने सुटका केल्यानंतरही चढ्ढा कोणत्याही पत्रकार परिषदेत किंवा जंतरमंतरवरील रॅलीत दिसले नाहीत. स्वाती मालीवाल यांच्यानंतर पक्षाशी उघडपणे संघर्ष करणारे राघव चढ्ढा हे राज्यसभेतील दुसरे खासदार ठरले आहेत. चढ्ढा पूर्णपणे एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे.