

पुणे : देशभरातील शेतकरी आणि नागरिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते त्या मान्सूनचे गुरुवारी केरळमध्ये आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाने तशी अधिकृत घोषणा केली. यंदा मान्सून नेहमीपेक्षा सुमारे तीन दिवस उशिराने दाखल झाला आहे. साधारणपणे मान्सूनचे केरळमध्ये १ जूनच्या आसपास आगमन होते.
यंदा अंदमानात मान्सूनचे आगमन १६ मे रोजी झाले. त्यामुळे तो २६ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला होता. येत्या दोन दिवसांत मान्सून कर्नाटकचा, तमिळनाडूचा आणखी काही भाग, दक्षिण महाराष्ट्र, संपूर्ण गोवा व्यापण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे तळकोकणात मान्सून ७ जूनच्या आसपास दाखल होत असतो.
पूर्वमोसमीचा धडाका
राज्याच्या बहुतांश भागात पूर्वमोसमी पाऊस होणार आहे. यात शुक्रवारी वर्धा, चंद्रपूर, अमरावती येथे जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्येही जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाचा मारा होणार आहे. सोमवारपर्यंत पाऊस कायम राहील.
पोषक स्थितीअभावी रेंगाळला : पोषक स्थितीअभावी मान्सून गेले काही दिवस दक्षिण अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात रेंगाळला होता. अरबी समुद्रात हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने मोसमी वाऱ्यांना बळकटी मिळाली. त्यामुळे मान्सूनने गुरुवारी थेट संपूर्ण केरळ व्यापत तमिळनाडू आणि कर्नाटकचा किंचित भाग व्यापला आहे. दरवर्षी साधारणपणे १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो.
दोन दिवसांत कोकणात
मान्सूनने गुरुवारी वेगाने प्रगती करीत अरबी समुद्रासह लक्षद्वीप, संपूर्ण केरळ, तसेच कर्नाटक, तमिळनाडूचा काही भाग व्यापला. येत्या दोन दिवसांत मान्सून संपूर्ण गोवा तसेच महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.