

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साठेबाजीवर केलेल्या कारवाईमुळे साखरेचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (एनएफसीएसएफ) चे अध्यक्ष प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.
साखरेच्या जहाजांपैकी काही जहाजे १५ ऑक्टोबरपूर्वी भारतीय बंदरांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, साखर आयातीत ब्राझील हा सध्या आयातीचा एकमेव स्त्रोत आहे. ब्राझीलहून माल भारतीय बंदरांपर्यंत पोहोचण्यासाठी ४० ते ४५ दिवस लागतात. माल उतरल्यानंतर बंदरातून कारखान्यांपर्यंत नेण्यासाठी अतिरिक्त वेळ लागतो.
त्यामुळे १५ ऑक्टोबरपूर्वी किती साखर येईल याचे निश्चित प्रमाण सांगणे कठीण आहे, परंतु तोपर्यंत काही माल पोहोचण्याची शक्यता चांगली आहे," असे नाईकनवरे म्हणाले.
महासंचालक परकीय व्यापार मान्यता, वाटप, पतपत्र जारी करणे आणि ब्राझीलमधील बंदरांवरील गर्दी या सर्व प्रक्रियांमुळे प्रमाणाचा अंदाज बांधणे आव्हानात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात आणि आंध्र प्रदेश या सागरीकिनारा असलेल्या राज्यांना आयात केलेली कच्ची साखर इतर राज्यांच्या तुलनेत वेगाने मिळण्याची शक्यता आहे.
पुरवठ्याची चिंता नाही
एनएफसीएसएफने २०२५-२६ हंगामासाठी साखर उत्पादन २७९ लाख टन राहील, असा अंदाज कायम ठेवला आहे. २०२६-२७ हंगामाच्या सुरुवातीला (१ ऑक्टोबर) ३५ लाख टनांचा सुरुवातीचा साठा उपलब्ध असेल. जो देशांतर्गत २५ लाख टनांच्या मासिक मागणीसाठी पुरेसा आहे.
शासकीय कारवाईनंतर दर घसरले
केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी उद्योग जगताला साठेबाजी रोखण्याचे आणि बाजारात पुरेसा पुरवठा करण्याचे निर्देश दिल्यानंतर साखरेचे भाव उतरू लागले आहेत. जीएसटी वगळून ६५-६७ रुपये प्रति किलोपर्यंत गेलेले एक्स-मिल दर ५ रुपयांनी घसरले आहेत.
जगातील बाजारातही भाव घसरले
भारताने आयातीची घोषणा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या साखरेचे दर १८ सेंट्सवरून १७.५० सेंट्स प्रति पाैंडपर्यंत खाली आले आहेत. जागतिक स्तरावर पुरवठा सुरळीत असल्याने या आयातीचा आंतरराष्ट्रीय किमतींवर प्रतिकूल परिणाम झालेला नाही.
शासनाची पावले
१ ते १४ ऑगस्ट दरम्यान कारखान्यांमधील साठ्याची प्रत्यक्ष तपासणी
व्यापाऱ्यांवर २०० टनांची साठा मर्यादा
मोठे खरेदीदारांवर मर्यादा
व्यापारी आणि साखर कारखान्यांच्या गोदामांवर भरारी पथकांचे छापे