
नवी दिल्ली : देशात साप चावल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्पदंशांवर काहीतरी उपाययोजना करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले.
न्या. बी.आर. गवई आणि न्या. एस.वी.एन. भट्टी यांच्या खंडपीठाने याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली.
त्यावेळी खंडपीठाने सांगितले की, हे प्रकरण कज्जेदलालीसाठी नाही. तुम्ही राज्यांची मदत घेऊ शकता. कारण ही समस्या संपूर्ण देशाची आहे. राज्यांसोबत बैठक घेऊन काहीतरी करावे.
याबाबतच्या याचिकेत म्हटले आहे की, देशात सर्प विष प्रतिबंधक लसींची कमतरता आहे. जगात साप चावल्यामुळे सर्वात जास्त मृत्यू भारतात होतात. दरवर्षी ५८ हजार जणांचा बळी साप चावल्यामुळे होत असतो.
सहा आठवड्यानंतर पुढील सुनावणी
याबाबत केंद्राने उचललेल्या निर्णयांची माहिती सुप्रीम कोर्टात सादर केली जाईल. तर काही राज्यांच्या वकिलांनी सांगितले की, आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करू. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ आठवड्यांनंतर केली जाणार आहे.