

नवी दिल्ली : सध्या देशातील सर्व जनताच तीव्र उकाड्याने त्रस्त झाली आहे. त्यात हवामानावर लक्ष ठेवणाऱ्या 'एक्यूआय.इन' या वेबसाइटने शुक्रवारी सकाळी जगातील ५० सर्वात उष्ण शहरांची यादी जाहीर केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे, ही सर्व शहरे भारतातीलच आहेत. या आकडेवारीनुसार, ओदिशाचे बलांगीर हे ४५ अंश सेल्सिअस तापमानासह पहिल्या क्रमांकावर होते.
त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि उत्तर प्रदेशातील प्रयागराज ४४ अंशांवर होते. याशिवाय छत्तीसगड, बिहार, तेलंगणा, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील अनेक शहरांचा या यादीत समावेश आहे. तेथे तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत होते. खरे तर उष्णतेच्या या लाटेने संपूर्ण देशभरातील जनता त्रस्त झाली आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे, जगातील या ५० सर्वात उष्ण शहरांपैकी अर्ध्याहून अधिक शहरे एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसी, बरेली, बांदा, आणि अयोध्या या शहरांमध्ये दुपारचे १२ वाजण्यापूर्वीच पारा ४२ ते ४३ अंशांला स्पर्श करतो.
दोन दिवस तीव्र उष्णतेची लाट
दरम्यान, राजस्थानमध्ये शनिवार, रविवार या दोन दिवसांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीही उष्णता कायम राहील. महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, तेलंगणा, उत्तर प्रदेशातही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर आसाम, मेघालय, केरळम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मुंबईत पावसाच्या सरी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही - लाही होत असतानाच शुक्रवारी सकाळी अचानक कोसळलेल्या मान्सूसपूर्व सरींनी मुंबईकर सुखावून गेला.
सकाळी मुंबईतील मुंबईतील भांडुप, मुलुंड, घाटकोपर, कांजूरमार्ग आदी भागांत पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील काही दिवसांत या भागांतही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.