

नवी मुंबई : रबाळे पोलीस ठाणे हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध रबाळे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कठोर कारवाई केली आहे.
आयुष अर्जुन देटके, अर्जुन बाबू चव्हाण अपर्णा संदीप आवळे, तखतसिंग प्रेमसिंग राठोड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहे तर अविनाश सुनील शिशुपाल, अनिकेत सुनील शिशुपाल व मोहम्मद शाहबाज खान यांचा शोध सुरू आहे. यातील राठोड याचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी चोरीचे सोने आहे हे माहिती असूनही तो या टोळीने चोरी केलेले सोने विकत घेत होता तर अपर्णा ही सोने विकण्यास मदत करीत होती.
२४ मार्च रोजी पहाटे ऐरोली सेक्टर-२ येथे निर्मला शांताराम पवार यांच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने हिसकावून नेली होती. त्याच दिवशी तळवली येथील मनपा शाळेसमोर जेन्सीबाई हरिश्चंद्र नाडार यांच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी करण्यात आले. ऐरोली गावातील जोशी व्हिलासमोर यमुना बाळासाहेब भोईर यांच्या गळ्यातील अंदाजे २० ग्रॅम वजनाची सोन्याची जीरा माळ जबरीने चोरी झाली होती.
पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड व त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्या तिन्ही गुन्हे उघडकीस आणले. आरोपींकडून चोरीस गेलेला अंदाजे १ लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अविनाश सुनील शिशुपाल व त्याच्या साथीदारांविरुद्ध नवी मुंबई व मुंबई परिसरात एकूण १४ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.