

नवी मुंबई : पामबीच मार्गावर ३ मार्च रोजी पहाटे घडलेल्या भीषण अपघातात कोपरखैरणे येथील प्रशांत विजय जमदाडे (२३) आणि हरमन कौर (१७) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबीयांनी केला असून, पोलीस तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या घटनेत मृत प्रशांत हा आपल्या कुटुंबाचा एकुलता एक आधार होता, तर हरमन ही देखील तिच्या आईची एकुलती एक मुलगी होती. सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या अपघातामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून न्यायासाठी त्यांनी आता प्रशासनाविरोधात आवाज उठवला आहे. पीडितांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, एका नामांकित बिल्डरच्या मुलांनी दारूच्या नशेत बेफाम वाहन चालवत हा अपघात घडवून आणला. मात्र, अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. तसेच त्यांच्या रक्तातील अल्कोहोल तपासण्याची महत्त्वाची संधीही गमावली गेल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रभावशाली व्यक्तींना वाचवले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तपास प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून, पीडित कुटुंबीयांना कोणतीही ठोस माहिती दिली जात नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
न्यायासाठी शांततामय कँडल मार्च
या घटनेच्या निषेधार्थ आणि न्यायाच्या मागणीसाठी सोमवार, ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शांततामय कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन पूर्णपणे कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने पार पडणार असल्याचे कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे.