Navi Mumbai : नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात उतरला करंट; स्कुटीवरून जाणाऱ्या दोन विद्यार्थिनी जखमी, Video

नेरुळ येथील एल. पी. ब्रिजखाली मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याचवेळी...
Navi Mumbai : नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात उतरला करंट; स्कुटीवरून जाणाऱ्या दोन विद्यार्थिनी जखमी, Video
Navi Mumbai : नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात उतरला करंट; स्कुटीवरून जाणाऱ्या दोन विद्यार्थिनी जखमी, Video (एक्स व्हिडिओ स्क्रीनशॉट)
Published on

नवी मुंबई : नेरुळमध्ये मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने बुधवारी (दि. १) मोठी दुर्घटना घडली. एल. पी. ब्रिज परिसरातून स्कुटीवरून जात असलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का बसून त्या रस्त्यावर कोसळल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शॉर्टसर्किटमुळे पाण्यात उतरला करंट

प्राथमिक माहितीनुसार, नेरुळ येथील एल. पी. ब्रिजखाली मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याचवेळी एका उघड्या विद्युत तारेमध्ये शॉर्टसर्किट होऊन साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह पसरला. त्याच पाण्यातून स्कुटीवरून जात असलेल्या दोन विद्यार्थिनी करंटच्या संपर्कात आल्या आणि रस्त्यावर कोसळल्या.

व्हायरल व्हिडिओत थरारक बचावकार्य

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही विद्यार्थिनी मुसळधार पावसात साचलेल्या पाण्यात रस्त्यावर पडलेल्या दिसत आहेत. परिसरातील वाहने थांबलेली असताना एका नागरिकाने झाडाच्या फांदीच्या साहाय्याने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्याचा थेट विद्युत प्रवाहाशी संपर्क येऊ नये. यानंतर दोघींना तातडीने रिक्षामधून डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

महापौर सुजाता पाटील यांच्याकडून पाहणी

नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी दोन्ही विद्यार्थिनी धोक्याबाहेर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पावसाळ्यातील सुरक्षाव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली.

उघड्या वायरी तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना

महापौरांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना शॉर्टसर्किटचे नेमके कारण शोधून निष्काळजीपणा झाला का, याची चौकशी करण्याचे निर्देश दिले. तसेच परिसरातील उघड्या विद्युत तारा आणि दोषपूर्ण विद्युत उपकरणांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश महापालिकेच्या विद्युत अभियंत्यांना दिले.

विविध विभागांकडून करण्यात आलेल्या खोदकामानंतर रस्त्यांची दुरुस्ती रखडल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. अपुरी देखभाल आणि अपूर्ण दुरुस्तीमुळे अशा घटना घडत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

महापालिका यंत्रणा सतर्क

नवी मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरभर आपत्कालीन पथके आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे सांगितले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in