...तर दुर्घटना टाळता आली असती, इर्शाळवाडीवरुन अमित ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका

येत्या निवडणुकीत मतदार किती संतापला आहे याचं उत्तर मिळेल, असं देखील अमित ठाकरे यावेळी म्हणाले
...तर दुर्घटना टाळता आली असती, इर्शाळवाडीवरुन अमित ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका

रायगडच्या इर्शाळवाडी गावार दरड कोसळून अख्खं गाव त्यात दबलं गेलं आहे. या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८ जण जखमी झाले आहेत. ११९ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. तसंच अजूनही मदतकार्य सुरु असून काही जण अडकल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. आपत्तीग्रस्तांना घर बांधण्याबाबत सिडकोला सांगितलं असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. तसंच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली असून जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

इर्शाळवाडी हे गाव दरडग्रस्तांच्या यादीत नव्हतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांनी देखील तेच सांगितलं. यावरुन सरकारवर टीका होत आहे. आता मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. अमित ठाकरे हे जळगावच्या दौऱ्यावर असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद सांधताना शिंदे सरकारवर टीका केली आहे. हे आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर दुर्घटना टाळता आली असती, अशी टीका अमित यांनी केली आहे. त्यांनी पहिल्यांदा सरकारवर टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सरकारवर टीका केली होती. राज ठाकरे यांनी इर्शाळवाडी येथील घटनेबाबत आधीच सरकारचं लक्ष वेधलं होतं. अशी घटना घडू शकते, सरकारने याकडे लक्ष दिलं पाहीजे, असं राज ठाकरे म्हणाले होते. आता अमित ठाकरे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. मनसेकडून स्वाक्षरी मोहीम राबवली जात होती. त्यात मतदार किती संतापला आहे हे तुम्हाला दिसून आलं असेल. येत्या निवडणुकीत मतदार किती संतापला आहे याचं उत्तर मिळेल, असं देखील अमित ठाकरे यावेळी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in